मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, December 25, 2007

तू येशील कधी

मेघांनी नभ झाकले, पसरला काळोख सर्वत्र हा
वारा वाहतसे अचानक पुन्हा ही वीज वाजे पहा
वर्षेची सर आज चिंब करण्या येऊन गेली जशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी

थंडी व्याकुळ घोर ती करितसे जीवास रात्रंदिनी
पानेही झडली तरूंवरुन ती, झाली हवा कोरडी
पुष्पांचा मधुगंध तो पसरुनी वाहे हवा मंदशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी

थंडी ती सरता धुके विरतसे कालांतराने मग
बैसोनी मग कोकिळा करितसे मंद स्वरे कूजन
येता नूतन पालवी बहरती झाडे वसंती जशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी


'शार्दूलविक्रीडित' या वृत्तात आज अचानक ही कविता जुळून आली (चाल- रामो राजमणि: सदा विजयते).

Monday, December 24, 2007

सहस्रचंद्रदर्शन

हिंदू संस्कृतीत जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे जन्मदिवस साजरा करण्याची पाश्चात्य पद्धतही भारतात आता चांगलीच रूढ झाली आहे. तरी, निदान काही जन्मदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत अशी विचारधाराही अस्तित्वात आहे व त्यातून एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, इत्यादि सोहळे लोकप्रिय झालेत. संस्कृतीचं जतन करणे ही बाब निश्चितच स्तुत्य आहे. पण, हल्ली प्रत्येक गोष्टीत घाई करण्याची सवय असते त्यानुसार विशेषत: सहस्रचंद्रदर्शनसोहळा लवकर साजरा केल्याचे प्रकार हल्ली अनेकदा घडले. या सोहळ्याविषयी मला काही जेष्ठ व्यक्तींकडून मिळालेली माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेखनप्रपंच. यात कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही.

सर्वप्रथम आपण हिंदू कालगणनेबद्दल थोडी माहिती करून घेऊ. हिंदू कालगणना चांद्र-सौर पद्धतीची आहे. म्हणजे, चांद्रमास प्रचलित असून अमावस्येच्या वेळी सूर्याच्या राशीवरून महिन्यांचं नामकरण केलं जातं. उदा. मीन राशीत सूर्य असताना अमावस्या झाली, की त्यानंतर सुरू होणार्‍या महिन्याला 'चैत्र' हे नाव देण्यात आलं व याप्रमाणे पुढील महिन्यांचं नामकरण केलं गेलं. सूर्य एकाच राशीत असताना दोन अमावस्या झाल्या, तर अनुक्रमे अधिक व निज असे एकाच नावाचे दोन महिने होतात. (उदा. अधिक श्रावण, निज श्रावण.) अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो. याचा अर्थ, हिंदू कालगणनेनुसार तीन वर्षांत १२X३+१ = ३७ महिने येतात. (क्षयमासाचा अपवाद वगळला आहे.) म्हणजे, ३ वर्षांत ३७ पौर्णिमा (३७ वेळा पूर्णचंद्र दिसतो) त्यानुसार ८१ वर्षांत ३७X२७ = ९९९ वेळा पूर्ण चंद्र दिसतो.

याचा अर्थ, पौर्णिमेचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवशी (पंचागानुसार ८१ वर्षे पूर्ण होतात तो दिवस) व इतर कोणत्याही तिथीचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवसानंतर येणार्‍या पहिल्या पौर्णिमेला १०००वा पूर्णचंद्र दिसेल. हाच सहस्रचंद्रदर्शनसोहळ्याचा दिवस.

Wednesday, December 19, 2007

हॅपी बर्थ डे

सप्रेम नमस्कार.

वाचकहो, या ब्लॉगला आज एक वर्ष पूर्ण झालं याचा मला अत्यंत आनंद होतोय. आज माझ्या लेखणीतून उमटलेल्या शाईकडे पाहतो, तेव्हा अनेक गोष्टी आठवतात.

"ब्लॉग लिहिणे" ही कल्पना जरी जुनी असली, तरी मला त्याबद्दलचं ज्ञान जरा उशिराच झालं. या ब्लॉगचा जन्म अचानकच झाला. या ब्लॉगच्या जन्माची गंमत आठवते. ऑर्कुटवरील "टेस्टिमोनियल" हा प्रकार मला आवडायचा. (अजूनही आवडतो.) आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल आपल्याला जे काही वाटतं ते त्यात लिहायचं असतं. पण, ते टेस्टिमोनियल केवळ ऑर्कुटवर प्रोफाईल असणार्‍यांसाठी लिहिता येतं व ते लिहिणारे व वाचणारेही ऑर्कुटचे सदस्य असावे लागतात. एकदा आर्कुटमध्ये माझ्या "फ्रेंडलिस्ट" मधील तुहिना केळकर (एन्. सी. एल्. मधील माझी लॅबमेट) हिचा ब्लॉग सापडला व "आपले विचार मांडण्यासाठी असंही काही अस्तित्वात आहे" हे कळलं. पण तो ब्लॉग इंग्लिशमध्ये आहे. मराठीत (देवनागरीत) असं काही असल्याचा बोध योगेश दामले यांच्या "आयुष्यातील काही पाने" या ब्लॉगमुळे झाला. त्यातलं वैविध्य पाहून उत्साह, मत्सर, महत्वाकांक्षा, इत्यादींनी त्यावेळी मी ग्रासलो होतो हे कबूल करतो. मग, कुणाबद्दल लिहिण्यापेक्षा एखाद्या विषयावर लिहिणं सोपं म्हणून मग "व्यक्तिरेखा" लिहिण्याचा विचार मागे पडला. आपण काहीतरी लिहायला हवं असं सारखं वाटत होतं. काय लिहावं?..... माझे व्हायोलिनक्लासचे गुरुबंधु, डॉ. मुकुंद जोगळेकर यांच्याकडे गेलो असताना एक विषय मिळाला व कुण्या एका भाग्यवेळी "वाहनयोग" हा विषय घेऊन दोन तासात "ऑन लाईन" लेखन केलं. ते "सेव" करून ठेवण्यासाठी "पब्लिश" वर टिचकी मारली. याहूच्या जिओसिटीजवर पूर्वी वेबपेज करून पाहिलं होतं. तेवढ्या तोडक्या ज्ञानाच्या आधारे माझं हे ब्लॉगलेखन प्रत्यक्षात इंटरनेटवर उपलब्ध होण्यासाठी एच.टी.एम.एल. चं प्रोग्रॅमिंग वगैरे काहीतरी करावं लागेल असं वाटलं होतं. पण नंतर लक्ष्यात आलं, की ते लेखन त्या क्षणीच इंटरनेटवर उपलब्ध झालं होतं. ब्लॉगलेखन इतकं सोपं असेल असं वाटलं नव्हतं. तर अशाप्रकारे, अपघाताने लेखणीतली शाई उमटली.

लहानपणी मी कविता करायचो. पण मधल्या काळात माझा तो छंद बंद पडला होता. या ब्लॉगमध्ये लिहिण्याच्या हेतूने का होईना, पुन्हा मी कविता करू लागलो. या ब्लॉगचे वाचक म्हणजे केवळ माझ्या संपर्कातील व्यक्ती असा माझा पूर्वी समज होता. पण, कालांतराने, मला अपरिचित असलेल्या व्यक्तींकडून प्रतिक्रिया मिळाल्या तेव्हा हुरूप वाढला.

या ब्लॉगवरील लेखनाची नोंद करण्यासाठी "मराठीब्लॉग विश्व"सारखी संकेतस्थळं असल्याची माहिती मात्र फार उशिरा झाली. एक दिवस सहज गुगल सर्च इंजिनमध्ये "लिस्ट ऑफ पब्लिकेशन्स" शोधता येतात का? ते पाहण्यासाठी माझं नाव टाकलं असताना हा बोध झाला. हा शोध लागल्यावर जणु काही अलिबाबाची गुहा हाती लागली असं वाटलं. माझ्यासारखं ब्लॉगलेखन करणारे इहलोकी कितीतरी आहेत हे कळलं आणि त्यांचे ब्लॉग वाचण्याची सवय लागली. त्यातून माझ्या ज्ञानात भर पडली आणि माझी विचारक्षमताही वृद्धिंगत होत गेली. मग, अभिप्रायांची देवाण-घेवाण सुरू झाली व वर्गमित्र, ई-मित्र, यांप्रमाणे "ब्लॉगमित्र" निर्माण झाले.

आज या लेखणीतल्या शाईचा वर्धापनदिन असल्यामुळे, या ब्लॉगला सामावून घेणार्‍या "मराठी ब्लॉगविश्व"चे अभिवादन करण्यासाठी माझ्या कुवतीप्रमाणे लहानशी कविता केली आहे. ("सॉनेट" या काव्यप्रकारासारखा "१,२,२,१ ; ३,४,४,३ ; ५,६,६,५ ; ७,७" या क्रमानुसार यमक जुळवण्याचा अत्यंत ओबडधोबड प्रयत्न केला आहे.) त्यात मराठी ब्लॉगविश्वात नोंद झालेल्या ब्लॉगांना गुंफण्याचा लहानसा प्रयोग आहे.

बसलो होतो चाळत माझ्या आयुष्यातली काही पानं
नकळत केव्हातरी उमटली लेखणीतली शाई एकदा
मराठी ब्लॉगविश्व भेटलं स्वैरपणे ती चालत असता
तिच्या मनातलं विश्व मग कधी तिचं तिला उलगडलं

कसं काय? म्हणाली शाईला हळूच झुळुक वार्‍याची,
ती उत्तरली, "माझी कोहम?ची शोधयात्रा चाले."
कथापौर्णिमा कुणाच्या अन् विखुरलेले मोती कुणाचे
संदिग्ध अर्थाचे उखाणे नित विचारांना प्रगल्भ करती

ब्लॉगविश्वी कुणी प्रकाशित करी 'माझे शब्द माझे गाणे'
विडंबन मग करण्या त्यांचे उपजली तेंडूची पाने
घडविला माझ्यातील लेखक..!! या लेखणीतल्या शाईने
दिलखुलास साहित्य चाळता होऊनी वाचक मनसोक्तपणे

अनुदिनी अनुतापे करी मनोमंथन लेखणीतली शाई
आनंद क्षण हा अस्तित्वास तिच्या आज वर्ष पुरे होई


कविता रटाळ न होऊ देता शक्य तितके ब्लॉग कवितेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्तही अनेक ब्लॉगांची नावं यात गुंफण्याची इच्छा होती. पण, माझ्या कल्पनाशक्तीच्या मर्यादांमुळे ते शक्य झालं नाही. या सर्वांकडून अशीच साहित्यिक मेजवानी मिळत राहो. आज मागे वळून पाहिल्यावर या ब्लॉगमित्र-मैत्रिणींच्या ऋणाची जाणीव होते. त्यातून मुक्त व्हावं अशी अजिबात इच्छा नाही. पण या ठिकाणी त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक वाटतं. तुमच्यापैकीही काही त्यांतले असाल. वाचक म्हणून तुमचेही मनःपूर्वक आभार. असं प्रेम करत रहा.

धन्यवाद.

आपला
प्रशांत उदय मनोहर


ता. क.
आपल्या माहितीतील व्यक्तींबद्दल काहीतरी लिहावं ही इच्छा अजूनही मनात आहे. योग्य वेळ आल्यावर तीही पूर्ण होईल असा विश्वास आहे.

-प्रशांत

Friday, November 30, 2007

चहाचा कप

आज सकाळी उशिरा जाग आली. लॅबला जायला उशीर नको म्हणून नित्यकर्मे झटपट उरकून घराबाहेर पडलो. लॅबमध्ये पोहोचल्यापासून साधारणत: तास-दीड तास बेचैन होतो.

काहीतरी विसरलोय वाटतं. काय विसरलो? घड्याळाला किल्ली दिली का मी? माझं रिस्टवॉच किल्लीवर चालणारं आहे. आजोबांचं आहे. ते गेल्यापासून मीच वापरतोय....ते जाऊ दे. काय विचार करत होतो मी? घड्याळाला किल्ली दिली का मी? हे काय! दिली आहे. चांगलं सुरू तर आहे घड्याळ! मग काय विसरलो असेन...?छोड ना यार! आठवेल तेव्हा आठवेल. आत्ता काय त्याचं? असा विचार केला आणि कामाला लागलो.

दुपार झाली आणि जेवायला कॅफेटेरियामध्ये गेलो. जेवत असताना, कुणीतरी कोणालातरी "इट्स नॉट माय कप ऑफ टी" म्हणालं, आणि एकदम ट्यूब पेटली... चहा! आज सकाळी चहा घ्यायचा राहिला! चऽला. म्हणजे काही महत्त्वाचं नाही राहिलं.

"काही महत्त्वाचं राहिलं नाही" हे फक्त सुस्कारा टाकण्यापुरतं. चहाचं महत्त्व चहा पिणार्‍यांखेरीज कोणाला कळेल? चहा! या शब्दातच किती चैतन्य आहे!"चहा" किंवा "चाय" असं जिथे म्हटलं जातं ती माझी मायभूमी धन्य आहे! तिथे नुसते चहा बनवण्याचे कितीतरी प्रकार आहेत. साधा चहा, मसाला चहा, स्पेशल चहा, आल्याचा चहा, .... न संपणारी यादी आहे.

माझी चहाची सुरवात दहावीमध्ये असताना झाली. मी आणि माझे काही मित्र, कधी माझ्या घरी तर कधी त्यांच्यापैकी कोणाकडे, रात्री जागून अभ्यास करायचो. तेव्हा, म्हणजे नागपूरला असताना, "लवकर निजे -लवकर उठे"ची सवय आजी-आजोबांमुळे होती. त्यामुळे, रात्री ९ नंतर घड्याळ पाहण्याचा योग एकदम सकाळी ६ वाजता यायचा. मी दहावीत गेल्यानंतर १०, ११.. घड्याळात रात्री वाजलेले पाहू लागलो. मग इतका वेळ कसं जागायचं? म्हणून मग चहा सुरू झाला. अगदी उत्साहात आलं किसून चहा करायचो. रात्री साडेदहा वाजता. मग काय? झाली सवय. कधीकधी (म्हणजे नेहमीच) कंटाळा यायचा अभ्यासाचा. पण चहा हवाच. अभ्यासाच्या निमित्याने चहा.. करता करता अभ्यास अगदी निमित्तमात्र झाला. असो. पण, मजा असायची त्यावेळी. बारावीत तर टपरीवर जाऊन चहा प्यायचो कधीकधी. रात्री सगळीकडे शांत शांत असताना टपरीचा चहा पिण्याचा मज़ा औरच आहे! नंतर मग शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये असताना अजनी रेल्वे स्टेशनचा चहा.. मग पुण्यात विद्यापीठात अनिकेत, युनिव्हर्सिटी कँटीन, शांतीनिकेतन, ७० एम.एम., इंटरनॅशन कँटीन, सगळं सगळं झालं. पण मला 'अनिकेत'चा चहाच आवडायचा.

तसा एन.सी.एल्.मधल्या जुन्या कँटीनमध्ये सकाळी १० वाजता मिळणारा चहाही चांगला असायचा. एन्.सी.एल्.मध्येही चहाचा वेगळाच मज़ा असे. आम्ही सर्व लॅबमेट्स आमच्या बॉसबरोबर चहा घ्यायचो. आणि त्यावेळी साईंटिफिक डिसकशनपासून क्रिकेट, फुटबॉल, डास मारण्याच्या पद्धती, वाईन, बॉलिवुड,.. कुठल्याही विषयावर तासभर चर्चा, वादविवाद चालायचे. गेले ऽऽऽ ते दिन गेले ऽऽऽ ....

पुण्याहून नागपुरला जायचो तेव्हाचं आठवतं. मामीआजी आणि मामाआजोबा थकलेले होते. पण मी त्यांच्याकडे गेल्यावर कपभर चहा व्हायचाच व्हायचा. मला त्यांच्याकडे चहा अगदी हवाच असायचा, असं अजिबात नाही. पण मी चहा घेतल्याने तेही खुश व्हायचे. आपल्याकडे कोणीतरी आलं, आपण कोणासाठी तरी चहा केला याचं, विशेषत: म्हातारपणी मानसिक समाधान मिळतं ते महत्त्वाचं असतं. लहानपणी तर मी आणि चिन्मय मामीआजीकडे जवळजवळ दररोज कॉफी प्यायचो. आता अगदी पुसटसं आठवतंय. घारेसरांकडे (पं. प्रभाकरराव घारे) व्हायोलिन शिकत असताना दर महिन्यात एका विद्यार्थ्याकडे संगीतसभा ठरायची तेव्हाही चहा असायचाच. अजूनही नागपूरला सरांकडे गेल्यावर चहा होतोच. आणि पुण्यातल्या सरांकडच्या (ख़ाँसाहेब उ. फ़ैयाज़ हुसेन ख़ाँसाहेब) तर कितीतरी आठवणी चहाशिवाय अपुर्‍या ठरतील. गुरुपौर्णिमा, गज़लांजलि असो किंवा सरांचा कार्यक्रम असो. कार्यक्रमाच्या रिहर्सलस्, बैठकी ... चहाशिवाय शक्य आहे का?

भूतकाळात कसा, खेचून गेला नाही चहा? पण, आता चहाचा "टी" झाल्यापासून ते कुठेतरी हरवलंय. इथे केफेटेरियामध्ये पेपरमिंट टी, लेमन टी, ग्रीन टी, असे अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकार चवीला चांगले आहेत यात वाद नाही. पण, यांपैकी कुठल्याही "टी"ला चहाची सर नाही. दॅट्स नॉट माय कप ऑफ टी! कारण, त्यात गरम पाणी, साखर, चहापत्ती इत्यादि "टी" बनवणारे पदार्थ आहेत, पण त्याचा चहा होण्यासाठी आवश्यकता असते ती गप्पागोष्टींमध्ये रंगून चहाचा आस्वाद घेणार्‍या चहाबाज कंपनीची आणि त्यांच्या प्रेमाची.

Monday, November 26, 2007

समुद्रलाटा

खळखळ खळखळ गर्जत येती समुद्रलाटा
किनार्‍यास चुंबुनिया फिरती समुद्रलाटा

दूरदेशि जी स्थिरावली पाखरे तयांना
मायभूमिचा निरोप देती समुद्रलाटा

कधी निरागस मुलांपरी त्या बागडती अन्
नाचत नाचत खेळत येती समुद्रलाटा

नवतरुणीसम करूनिया शृंगार साजरा
लाजत लाजत ठुमकत येती समुद्रलाटा

रविकिरणांसह आणिक रात्री चांदण्यासवे
मनमुराद त्या क्रीडा करिती समुद्रलाटा

कोलाहल जो विश्वामध्ये अखंड चाले
प्रतिबिंबित त्याला नित करिती समुद्रलाटा

त्यागियले विश्वाने जे जे, सर्व सर्व ते
स्वीकारुन उदरी साठविती समुद्रलाटा

अंतरीच्या वेदना सागरा असह्य होता
रौद्ररूप मग धारण करिती समुद्रलाटा

Sunday, November 4, 2007

पश्चिमरंग

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथून पी.एच्.डी केल्यावर उदरनिर्वाहासाठी मी सध्या लॉस् एन्जेलिस् (कॅलिफ़ोर्निया) येथे आलो आहे. इथे येण्यापूर्वी भारतातून अमेरिकेत जाणार्‍या लोकांना ज्या परिस्थितीतून जावं लागतं त्यातून मीही गेलो. "प्रशांत मनोहर अमेरिकेला जाणार" यावरून अनेकांची मतं, तर्क, अनुभव, इत्यादि कानांवर पडली. " आता अमेरिकेत गेल्यावर कुठे परत येणार आहेस तू! तिथेच सेटल होशील.", अमेरिकन डॉलरची घसरलेली किंमत, भारत-अमेरिका राजकीय संबंध, इत्यादि सर्व विषयांची पारायणं झालीत. या सर्व चर्चांचा केंद्रबिंदू असताना माझ्या सर्व आप्तस्वकीयांकडून भरपूर लाड करून घेतले. या दरम्यान काही दुर्मीळ गाठीभेटीही झाल्यात. या सर्व संवादानंतर "अमेरिकेत असं असेल... तसं असेल....." इत्यादि विचार सुरू असताना कल्पनेतल्या अमेरिकेचं चित्र तयार झालं.

माझा अमेरिकेत फक्त दोन वर्ष मुक्काम असणार आहे. त्यानंतरचं अजून ठरलं नसलं, तरी अमेरिकेतच मुक्काम वाढण्याची शक्यता कमी आहे. असं असूनही "तू कसला परत येतोय?..." हे किंवा या स्वरूपाचे प्रश्न लोकांना पडले, कारण इथे आलेले भारतीय सहसा भारतात परतत नाही असंच आतापर्यंत झालं आहे.

असो. व्हिसा झला, तिकिट काढलं, ठरल्याप्रमाणे प्रवास झाला आणि पाहता-पाहता अमेरिकेत येऊन एक महिना सरलाही. या दरम्यान वास्तवातल्या अमेरिकेनं माझ्या 'कल्पनेतल्या' अमेरिकेची चांगलीच विकेट घेतली. अमेरिकेत सोशल सिक्युरिटी नंबरसाठी लवकरात लवकर अर्ज करावा लागतो. कारण सर्व कार्यालयीन गोष्टी सोशल सिक्युरिटीवर अवलंबून असतात. हा अर्ज करण्यासाठी किमान दहा दिवस थांबावं लागतं, कारण ज्या विमानाने आपण अमेरिकेत येतो, त्या कंपनीकडून आवश्यक माहिती सोशल सिक्युरिटी ऑफिसमध्ये यायला तेवढा वेळ लागतो. इथे आल्यावर दहाव्या दिवशी मी अर्ज करायला गेलो असताना इमिग्रेशनच्या वेळी माझ्या नावाचं स्पेलिंग चुकवण्यात आल्याचा मला साक्षात्कार झाला. "म्हणजे आता सोशल सिक्युरिटीचं काम आणखी लांबणार! अरे देवा!... अमेरिकेतही असल्या चुका होतात!" असे विचार मनाला चाटून गेले. काम लांबल्याचं दुःख आणि "इथेही चुका होतात"चा असुरी आनंद.

स्वाभाविकच होतं. इथे आल्या आल्या खर्च बराच असतो पण पुरेसे पैसे नसतात. जे पैसे मिळणार असतात त्यासाठी सोशल सिक्युरिटी आवश्यक असते व त्याला दोन-चार आठवडे लागतात. त्यात नवा देश, नवी माणसं व त्यांबद्दल पुरेशी माहिती नसते. आपला देश, आपली माणसं यांना सोडून आल्यावर पहिल्या क्षणापासून तुलना सुरु होते. त्यात, पहिल्यांदाच आपला देश प्रिय असल्याची तीव्र जाणीव झाल्यामुळे जरा कुठे काही खुट्ट झालं, की "भारतात काय वाईट होतं? कुठून दुर्बुद्धी झाली मला इथे येण्याची? इथे काय मोठं अगदी सोनं चिकटलंय अमेरिकेला! इथल्या भारतीयांनी तरी काय पाहिलं अमेरिकेत? देव जाणे!" असे विचार पदोपदी येतात. पण ही तात्पुरती अवस्था असते. एकदा सोशल सिक्युरिटीचा अर्ज केला, की कामांना वेग येतो आणि मग याच गोष्टींकडे सकारात्मक दुष्टिकोणातून पाहू लागतो.

सोशल सिक्युरिटी ऑफिसमध्ये सांगितल्यानुसार युनिव्हर्सिटीतील संबंधित अधिकार्‍याशी संपर्क केला व नाव दुरुस्तीसाठी संबंधित कार्यालयाचा पत्ता घेतला. सुदैवानं माझा पुनःनामकरणविधी लवकर पार पडला आणि मी सोशल सिक्युरिटीचा अर्ज भरला. त्यानंतर जेव्हा भारत-अमेरिका यांच्या कामकाजाच्या पद्धतीविषयी किंवा संस्कृतीबद्दल मी तुलना करू लागलो, तेव्हा निरीक्षणातून बरंच शिकलो आणि दृष्टिकोण अधिक प्रगल्भ होत गेला.

इथे प्रत्येक कामात सुसूत्रता दिसून येते. हेच बघा ना. मी इथे आल्यावर पे-रोल, ओरिएंटेशन इत्यादि कार्यालयीन कामांसाठी गेलो असताना पासपोर्ट, व्हिसा, डी.एस्.२०१९, आय. ९४ ही डॉक्युमेन्टस् दाखवलीत. त्यावेळी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची फोटोकॉपी काढून संबंधित अधिकार्‍यांनी मला मूळ कागदपत्रं सुपूर्त केलेत. यात माझा फोटोकॉपी काढण्याचा वेळ आणि खर्च तर वाचलाच, पण 'अटेस्टेशन'ची गरज पडली नाही. "भारतातही हे आता सहज शक्य आहे..."(मनांत). इथल्या कामकाजात सर्वप्रथम नजरेत भरलेली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. नियमांना धरून चालणे आणि 'कस्टमर देवो भव' या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. वेळ लागला तरी चालेल, पण नियम मोडून कुणी वाहतुकीला अडथळा देण्याचे प्रकार इथे घडत नाहीत. इथे अगदी लहानातलं लहान काम असो. ते करणार्‍याला स्वतःबद्दल आणि कामाबद्दल अभिमान असतो. तो स्वाभिमान मनाला भावला - 'खालच्या प्रतीचं', 'वरच्या प्रतीचं' अशा विचारांना थारा न देणारा, माझं काम हे उत्तमच असणार असा आत्मविश्वास निर्माण करणारा. समर्पण, प्रामाणिकपणा आणि आत्मपरीक्षण यांचा अवलंब केला तर का येणार नाही आत्मविश्वास? मदत करायला सदैव तत्पर आणि 'वर्क इज वर्शिप' असं मानणारे लोक भेटू लागले आणि एकंदरीतच 'मी', 'माझा देश', 'माझी संस्कृती' या नावाखाली मी स्वतःचाच अहंकार कुरवाळतोय याची जाणीव झाली.

अहंकार? हो. अहंकारच. स्वाभिमान नाहीच. कारण, त्यात आत्मपरीक्षण नाही आणि असलेच, तर ते प्रामाणिक नाही कारण कामात समर्पण नाही. कुठल्या गोष्टींचा अहंकार बाळगत होतो? माझ्या संस्कृतीचा? नाही. कारण, संस्कृतीला जाणून घ्यायला वेळ कुणाला आहे? वेळ का नाही? - कारण, संस्कृती रामराज्याच्या गोष्टी करते. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचार पसरला आहे. चरांचरांत!

पण मग रामराज्य म्हणजे काय? - राम हा स्वतः विष्णुचा अवतार. आणि त्याची पत्नी, धरणीकन्या सीता, ही लक्ष्मीचंच रूप होती. तिच्या पावित्र्याबद्दल रामाला तिळमात्र शंका नव्हती. तिलाही ते माहित होतं. धोब्याला मात्र शंका आली म्हणून सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. ही अग्निपरीक्षा सीतेची किंवा रामपत्नीची नव्हतीच. ती होती अयोध्येच्या राणीची. या प्रकाराबद्दल धोब्याला दंड झाला नाही. का? - कारण, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती शुद्ध चारित्र्याची असावी हा त्याचा विचार योग्यच होता. आणि त्यासाठी वेळ पडली तर देशाची राणीही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे हा त्या धोब्याला सीतेचा आणि रामाचा संदेश होता. जिथे प्रत्येक नागरिकाच्या पावित्र्याबद्दल धोब्यासारखी सामान्य व्यक्ती आग्रही आहे व जिथे देशाची राणीही अग्निपरीक्षेला तयार आहे तिथे रामराज्य येणारच - नव्हे, असणारच!

सीतेलाही अग्निपरीक्षा चुकली नाही. मग मला ती द्यावी लागली तर मी तयार होईन? मी अमुक आहे, मी अमक्याच अमूक, तमक्याचा तमुक, इत्यादि मुखवट्यांतून बाहेर पडेन?..... पण मीच का बाहेर पडू यातून? मी अग्निपरीक्षा देणाने काय साध्य होणार आहे? आणि जोपर्यंत समाज सुधरत नाही तोपर्यंत माझ्या प्रामाणिकपणाचा काय उपयोग? .........

Saturday, October 20, 2007

अस्तित्व तुझे

पुनवेच्या चांदण्यासम अस्तित्व तुझे
मधुर मधुर अमृत त्यातुन ओसंडतसे

पहाटेच्या समीरासम अस्तित्व तुझे
स्पर्शुन पळता मनास करी वेडेपिसे

जाई-जुईच्या सुमनांसम अस्तित्व तुझे
सुगंधात त्यांच्या परिसर नित नाहतसे

मारुबिहागी शुद्ध 'म' जणु अस्तित्व तुझे
हळूच येऊन झळके अन् मग लोपतसे

सांजवात समईची जणु अस्तित्व तुझे
राउळात तेजोमय ज्योती तेवतसे

Saturday, September 22, 2007

दृष्टिकोण

रवी मावळला, दिन सरला अन् रात्र जाहली
कुणी चमचमत्या तार्‍यांची नभी नक्षी पाहिली

पाऊस आला अन् चिखलाने वस्त्र माखले
शेतात कुणी उत्साहाने बीज पेरले

सूर्य तळपला अन् उन्हात हा देह पोळला
नितळ निळे आकाश कुणी अवलोकुनि गेला

घराबाहेर पडला अन् विरहाने रडला
गगनभरारी घेऊन कुणी विश्वात नांदला

वचन

दूर दूर जरी चाललो मी तुझ्यापासून
सतत तरी तुजला स्मरणार माझे मन
कार्य पूर्ण होता येईन त्वरित परतून
जाताना देतो तुजला मी हे वचन

Wednesday, August 15, 2007

भारतीय स्वातंत्र्याचा हिरक-महोत्सव

आज हिरक-महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा
करू उत्साहे साजरा आज क्षण हा भाग्याचा

आज हिरक-महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा
आला मंगल दिन हा हुतात्म्यांना स्मरण्याचा


आज हिरक-महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा
तोरणे उभारून तिरंगा पूजण्याचा

आज हिरक-महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा
भारतमातेला स्मरून गरुडझेप घेण्याचा

Sunday, July 29, 2007

गुरुपूजन

अव्याहत केले तू आम्हाला ज्ञानदान
देतसे सुगंध जैसे झिजूनिया चंदन
आज गुरुपौर्णिमा असे सोनियाचा दिन
मन हे झाले अधीर करण्या तव पूजन

Wednesday, July 25, 2007

सरल्या सरी वर्षेच्या

सरल्या सरी वर्षेच्या अन् लख्ख जाहले आकाश
पुन्हा नव्याने प्राची उजळे, पडला सूर्यप्रकाश

बागेमध्ये सुवासिक फुले रंगीबेरंगी फुलती
फुलपाखरे विहार आता स्वैरपणे त्यांवर करती

आकाशाची अथांग निळाई नयनांना नित तृप्त करी
नक्षी त्यावर करण्यासाठी पक्षी उडती अंबरी

कृष्णमेघ ते सरले आता मोद पसरला चोहिकडे
सोनेरी कोवळ्या उन्हाचा धरणीवर या वर्ख चढे

Tuesday, July 10, 2007

थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे

मेघ दाटले नभात, तिमिर होई चहुकडे
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे

जाहला असे उशीर
मन हे झाले अधीर
पाहूनिया वाट माझी, बाळ माझे रडे
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे

बरसलास अविश्रांत
आता तरी होई शांत
बुडली पाण्यात वाट, पाऊलही अडखळे
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे

Saturday, June 23, 2007

नवं कोरं

नुकतंच एन्.सी.एल्.मध्ये नवं कॅन्टीन सुरू झालं. बर्‍याच दिवसांपासून या नव्या कॅन्टीनबद्दल एन्.सी.एल्.च्या साइंटिफिक व नॉन्-साइंटिफिक स्टाफमध्ये चर्चा सुरू होती. अर्थात, बहुतांश लोक त्याबद्दल उत्सुक होते हे वेगळं सांगायला नको. तसं एन्.सी.एल्.मध्ये कॅन्टीन नव्हतं अशातला भाग नाही. पण, एकंदरीत तिथल्या सेवेचा दर्जा पाहिला की खाण्यापिण्याच्या बाबतीत आकर्षणापेक्षा अनासक्तीच निर्माण होत असे. वैज्ञानिक संशोधनात भारतात आघाडीवर असलेली ही प्रयोगशाळा तिच्या कर्मचार्‍यांच्या जेवणाखाण्याच्या बाबतीत मात्र संपूर्ण उदासीन! सरकारी कचेरीतलं "लोएस्ट कोटेशन"चं तत्व म्हटलं की आणखी काय अपेक्षा करणार?

पण, या नव्या कॅन्टीनचं तसं नाहीये. नवं कॅन्टीन दिवसभर सुरू राहणार असून रात्रीचं जेवणही तिथे उपलब्ध असल्यामुळे इथे कॉलनीत पेइंग गेस्ट म्हणून राहणार्‍या रिसर्चच्या विद्यार्थ्यांची खूप मोठी सोय झाली आहे. खाजगी पार्टीकडे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे चहापासून जेवणापर्यंत सगळ्याचा दर्जा उत्कृष्ठ आहे. एकंदरीतच स्वच्छता, नीटनेटकेपणा व टापटीप म्हणून गेल्या दोन-तीन दिवसांपासून या कॅन्टीनमध्ये लोकांनी गर्दी करायला सुरवात केली. काचेच्या भिंती असल्यामुळे कॅन्टीनच्या बाहेरची हिरवळ प्रसन्न करून जाते. त्यात पाऊस पडत असेल तर... क्या बात है! .... हातात चहाचा कप, समोर डिशमध्ये गरमगरम बटाटावडा .... दिवसभरातला कामाचा शीण कसा एका झटक्यात पळून जाईल! केवळ "खाण्यापिण्याची उत्तम सोय" म्हणून या घटनेला महत्त्वं नाहीये. दिवस-रात्र एक करून संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना (विशेषत: बाहेरगावांहून आलेल्यांना) यापूर्वी जेवणासाठी बराच खर्च करूनही तडजोड करावी लागायची. जुन्या कॅन्टीनमध्ये दुपारचं जेवण ज्यांनी केलंय त्यांना हे विशेषत: जाणवेल. त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला हे निश्चितच महत्त्वाचं आहे.

मी सध्या थिसिस जमा होऊन व्हायवाची वाट पाहणार्‍या व्यक्तींपैकी एक असल्यामुळे आवराआवर हेच सध्याचं माझं मुख्य काम आहे. लॅबमधल्या नव्या सदस्यांना मदत करणे, लॅबमधले प्रोग्रॅम्स, प्रोग्रॅमिंग स्ट्रॅटेजी, समजावून सांगणे इत्यादि गोष्टीही आहेतच. काल असंच एका ज्युनिअरला एक डेरिव्हेशन समजावण्यासाठी बसायचं होतं. रुचिपालट म्हणून आज नव्या कॅन्टीनमध्ये बसायचं ठरलं. दुपारची वेळ असल्यामुळे कॅन्टीनमध्ये गर्दी अजिबात नव्हती. चहा बनायला अजून वेळ होता. त्यामुळे त्या प्रसन्न वातावरणात मस्त काम झालं. खरंच! निसर्गाच्या सान्निध्यात चहा पितानाही महत्त्वाची कामं हसत खेळत होऊ शकतात! हे कॅन्टीन पूर्वीही असतं तर माझ्यासारख्या थिअरॉटिकल - कॉम्प्यूटेशनल केमेस्ट्रीच्या संशोधन-विद्यार्थ्यांनी त्याचा किती तरी उपयोग करून घेतला असता या विचारातून मला त्या ज्युनिअरचा हेवा वाटला. कामाविषयीची चर्चा झाल्यावर आम्ही दोघांनी चहा घेतला आणि बाहेर पडलो.

लॅबमध्ये परतताना जुन्या कॅन्टीनकडे लक्ष्य गेलं आणि अनेक विचार मनात आले. पूर्वी चहा-नाश्ता करण्याचं आमचं एकमेव ठिकाण असलेलं हे कॅन्टीन आज नव्या कॅन्टीनमुळे रिकामं रिकामं वाटतंय. तिथे अगदीच कुणी जात नाही असं नाही, पण नेहमीपेक्षा गर्दी कमी झाली आहे. काल तर त्या कॅन्टीनमध्ये व्हेज-कटलेट असूनही गर्दी कमी होती! व्हेज-कटलेट हा त्या कॅन्टीनमध्ये मिळणार्‍या चांगलं म्हणावं अशा काही निवडक पदार्थांपैकी एक होता. पूर्वी कॅन्टीनमध्ये उशिरा जाणारे व्हेज-कटलेटपासून वंचित असायचे, आणि काल, व्हेज-कटलेट लोकांपासून वंचित होतं! तिथला चहासुद्धा खूप चांगला नसला, तरी म्हणावा तेवढा वाईटही नसायचा. त्यामुळे, त्या कॅन्टीनची ही अवस्था पाहून थोडं दुःख झालं. पण, नव्या कॅन्टीनमुळे लोकांसाठी पर्याय उपलब्ध झाल्यामुळे "आता दोन्ही कॅन्टीन आपापल्या सेवेचा दर्जा उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करतील" अशी आशा करून कामाला लागलो.

नवीन कॅन्टीनच्या स्वागताला पावसाळाही सुरू झाला आहे. त्यानं कॅन्टीनचा परिसरच नव्हे, तर सर्वांची मनंही प्रसन्न केली आहेत. हा नवा पाऊस मला नेहमी बालपणात घेऊन जातो. उन्हाळ्याची सुटी संपून पुन्हा शाळा सुरु होते. शाळेतल्या मित्रांची पुन्हा नव्यानं भेट, नवीन वर्ग, नवीन बाक, नवीन वह्या-पुस्तकं, सगळं कसं नवं कोरं. नवीन सुरवात करायला हा पावसाळा दरवर्षी एक नवा उत्साह घेऊन येत असतो.

पण कालांतरानं सगळं सवयीचं होऊन जातं. वह्या-पुस्तकांचा कोरेपणा चार-पाच दिवसांतच नाहीसा होतो. रोजच्या गोष्टींमधलं नाविन्यही जाणवेनासं होतं. पावसातली प्रसन्नता संपते आणि मागे उरते फक्त चिखल. चौकांतले महात्म्यांचे पुतळे जसे रोजचे झाल्यामुळे दुर्लक्षित होतात तसं काहीसं होतं. खरंच, नव्या कॅन्टीनचं हे कौतुक किती दिवस राहील? कदाचित जुनं कॅन्टीन - नवं कॅन्टीन असे दोन्ही पर्याय लोक निवडू लागतील व जुन्या कॅन्टीनला पुन्हा थोडी उभारी येईल. किंवा लोकांनी पाठ फिरवल्यामुळे जुनं कॅन्टीन बंद पडेल व नवीन कॅन्टीन हाच भविष्यातला एकमेव पर्याय असेल. सवयीचं झाल्यावर नवीन कॅन्टीनचाही दर्जा खालावणार नाही असं खात्रीपूर्वक म्हणता येईल? कॅन्टीनचं काय किंवा आयुष्याचं काय? त्यातलं नाविन्य व कोरेपणा अबाधित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवं. तरंच त्यात चहातला ताजेपणा व पावसाचा ओलावा टिकून राहणार.

Thursday, June 21, 2007

अर्थ एकाकीपणाचा

अर्थ एकाकीपणाचा दाव ना आतातरी
यासवे का चालणे मज वाट आता जीवनी?
सांग का मी दूर राहू, दूर तुझियावाचुनी
पोकळी सलते तुझी जी जाहलीसे मन्मनी

भावना खचल्या मनीच्या शब्दि व्यक्त करू कसे
प्रेमरक्ताळल्या नयनां शल्य त्यांचे ना दिसे
व्यथा ते मज सांगता हा श्वासही मग अडखळतसे
मजसवे तू चल जरा, मग रात्री या सरतीलही
स्वैर त्या अन् मुक्त होतिल, सूर्य नभ उजळेलही
"कामना तव पूर्ण होतील" ते मला जणु सांगती

चालते जीवन पुढे जणु अंत त्या नच सापडे
लोचने ही दगड होउनि छटा त्याच्या पाहती
ते न काही बोलती मजला परी न्याहाळती
ये कधी अपराधि भाव, कधी निरंतर प्रेमही
मजसवे आहेस ना तू, थांग ना लागे तरी
"कामना तव पूर्ण होतील" ते मला जणु सांगती


टीप: "बॅक स्ट्रीट बॉईज" या इंग्रजी गाण्यांच्या अल्बममधील "शो मी द मीनिंग ऑफ बीईंग लोनली" या गाण्याचा मला सुचलेला स्वैर अनुवाद. अर्थ लागण्याच्या दृष्टिकोणातून त्यात मला आवश्यक वाटलेले बदल केले आहेत.

Wednesday, June 6, 2007

वर्षेची चाहूल












मोराने फुलविला पिसारा आज पुन्हा
वर्षेची चाहूल लागली आज पुन्हा

शीतल वारा ऐक सांगतो अवनीला
सुगंध मातीचा दरवळला आज पुन्हा

लपंडाव का सूर्याची किरणे करती?
सरतील का घन बरसल्याविना आज पुन्हा?

पाहिलीस का सुंदर नक्षी आकाशी?
निळे-केशरी रंग पसरले आज पुन्हा

कालच झाली ओळख आपुली स्वप्नात
सांग तू मला भेटशील का आज पुन्हा?



Monday, May 14, 2007

सावली

कालच "सावली" हा मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला. या चित्रपटाबद्दल अनेक लोकांकडून ऐकलं होतं. खरं तर हा चित्रपट बर्‍याच दिवसांपूर्वी चित्रपटगृहांत लागला होता. माझा पाहण्याचा योग इतका उशिरा आला, कारण आळस! आज जाऊ, उद्या जाऊ, करता करता कालचा रविवार उजाडला. काल बर्‍याच दिवसांनंतर मोकळा रविवारही होता, त्यामुळे चित्रपट पाहण्याचा निर्णय पक्का झाला.

स्वरांच्या रम्य प्रवासात या चित्रपटानं एक गंभीर विषय अत्यंत समर्थपणे हाताळला आहे. संगीताची तपश्चर्या करून लोकप्रिय, नव्हे - लोकमान्य झालेल्या कलाकाराचं अपत्य यात केंद्रस्थानी आहे. एखाद्या कीर्तिमान कलाकाराचं अपत्य जर त्या कलाकाराच्याच मार्गदर्शनाखाली मोठं होत असेल, तर लोक स्वाभाविकपणे या नव्या कलाकाराची तुलना त्याच्या गुरूशी करू लागतात. ही तुलना जरी गुरू-शिष्यांमध्ये असली, तरी या संदर्भात निसर्गत: असलेलं माता-कन्या हे नातं अधिक नाजुक व महत्त्वाचं आहे. माता गुरू असल्यामुळे आपली कन्या आपल्यासारखीच मोठी व्हावी या आईच्या भावनेला गुरूच्या ज्ञानाची जोड मिळते. त्यामुळे मायेच्या ओलाव्यापेक्षा गुरूचा कठोरपणाच वरचढ होतो. कलेत योग्य तर्‍हेने प्रगती होत असूनही मुलीच्या पाठीवर आईची शाबासकी मिळण्याऐवजी या शिष्याच्या वाट्याला गुरूची करडी नजरच येते. इतर समवयस्क गुरूभगिनींना मात्र आईचं प्रेम घरी मिळत असल्यामुळे गुरूचा कठोरपणा इतका जाणवत नाही. शिवाय गुरूचं अपत्य नसल्यामुळे अशी तुलनाही होत नाही. गुरूचं अपत्य असलेल्या या शिष्यावर या सर्वांचा परिणाम होऊन या कलेविषयी मनात एक प्रकारचा तिटकारा जन्म घेतो. हा शिष्य आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतो त्यावेळी गुरूला दुःख होणं स्वाभाविक आहे. पण शिष्याची प्रगती व्हावी हीच गुरूची इच्छा असल्यामुळे, बाहेरून कठोर झालेला गुरू आतून मात्र आपल्या शिष्य असलेल्या अपत्याच्या यशाने सुखावतो व मनातल्या मनात शिष्याला आशिर्वादही देतो.

शिवेन्दु अगरवाल यांची निर्मिती व रजेंद्र तालक यांचं दिग्दर्शन असलेल्या २००६ सालच्या या चित्रपटाची पटकथा प्रतिमा कुलकर्णी यांची आहे. रिमा लागू, अमृता सुभाष, प्रदीप वेलणकर, उर्मिला कानेटकर, स्वप्नील बांदोडकर व अमिता खोपकर हे मुख्य कलाकार आहेत. अशोक पत्की यांचं संगीत दिग्दर्शन, देवकी पंडित यांचा स्वर म्हटल्यावर स्वरांची मेजवानी असणार हे सांगावं लागलं तरंच नवल. शिवाय स्वप्नील बांदोडकर यांचाही पार्श्वगायनात सहभाग आहेच. आरती नायक व जानकी अय्यर यांनी गायलेल्या "सुरजन सो मिला .." या हमीर रागातल्या बंदिशीमुळे सुरवातीपासूनच एक वातावरण निर्मिती होते. आणि या स्वररूपी मंदिराचा सुवर्ण कळस म्हणजे आरती अंकलीकर-टिकेकर व सावनी शेंडे यांनी प्रस्तुत केलेल्या बंदिशी. बंदिशी ऐकताना मनातल्या मनात वाह वा! देत होतो. हा चित्रपट संपू नये असंच वाटत होतं. एका गंभीर विषयाचं इतकं सुरेल प्रस्तुतीकरण खरोखरच अविस्मरणीय आहे. उत्तम कलाकृती दिल्याबद्दल "सावली"च्या संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन.

Sunday, April 22, 2007

अनंत भुवन

आज बर्‍याच दिवसांनी ऑर्कुटचा समाचार घेतला तेव्हा स्क्रॅपबुकमध्ये सौरभचं "अनंत भुवन" कम्युनिटीत प्रवेश करण्याचं आमंत्रण दिसलं. "अनंत भुवन" नावाची कम्युनिटी सौरभमुळे ऑर्कुटवर अस्तित्वात आली हे पाहून अत्यंत आनंद झाला.

अनंत भुवन
टिकेकर रोड
धनतोली
नागपुर ४४००१२

हा चार ओळींचा पत्ता. इथेच मी लहानाचा मोठा झालो. या पत्त्यात माझ्याच नव्हे, तर अनंत भुवनातल्या सर्वांच्याच अनेक आठवणी दडल्या आहेत. सौरभचं आमंत्रण स्वीकारलं तेव्हा त्या सर्व आठवणी उचंबळून आल्यात. उत्स्फूर्तपणे त्या कवितेच्या रूपात प्रकटल्यात. ती कविता -




आठवांत जिच्या खोळंबले मन
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

कितीदा वास्तूने ऐकली अंगाई
आणि लग्नांतील चौघडा सनई
पाहिल्या मुंजी, पाहिली उष्टावणं
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

मित्रमंडळी अन् आप्त इष्ट सारे
वाड्यात कितींदा पाहुणचार झाले
झाली जिथे कितीतरी केळवणं
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

दिन मास आणिक वर्षेही सरली
किती झाले दसरे आणि दीपावली
आणिक कोजागिरीची झाली जागरणं
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

कोसळले कधी दुःख कुणाकडे
वाड्याचीच सार्‍या झोप तेव्हा उडे
थोर लहानांचे करिती सांत्वन
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

कुणी कधी जर सापडले संकटात
मदतीचे त्वरित पुढे येती हात
कुठल्याकुठे संकट जाई ते पळून
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

चर्चासत्रे क्रिकेट, राजकारणाची
विषयांना बंदी न कधी कशाची
सहभागी होती थोर अन् लहान
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

कुणी प्रवासास चालला बाहेर
वडीलधार्‍यांना करी नमस्कार
देण्या निरोप भरे जेथे अंगण
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

ही वास्तू साक्षात् आमुची जननी
मायेचा हात फिरवला अंगावरुनी
दिधला जिने आम्हाला स्वाभिमान
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन






Friday, April 13, 2007

उषःकाल

मी शाळेत (हडस हायस्कूल, नागपुर) शिकत असताना शाळेच्या एका स्मरणिकेत प्रकाशनासाठी दिलेली कविता आज अचानक आठवली. ती इथे देत आहे.

प्रभातसमयी दिसले मजला निळे गगनमंडल,
त्यामध्ये दिसती काही ते शुभ्र पांढरे मेघ.

कसे केशरी जाहले हे पूर्वेकडिल नभ?
इंद्राने नेसले काय हे भरजरी पीतांबर?

सोनेरी दागिने घातले काय कुबेराने?
गगनमंडली प्रवास केला का या तेजाने?

उदयगिरीवर तेजस्वी हा भव्य सूर्य आला;
तळ्यामध्ये कमळ उमलले उषःकाल झाला!


(१९९१-१९९२)

Friday, March 23, 2007

लेखणीतली शाई

लेखणीतली शाई रसिका तुझ्याचसाठी
विचारसुमनांची ही मालिका तुझ्याचसाठी

नभोमंडली अखंड फिरती ग्रहनक्षत्रे
पुनवेचे हे टिपुर चांदणे तुझ्याचसाठी

ग्रीष्मातिल तव तृषार्त आणिक शिणलेले मन
प्रसन्न करण्या वाहे सरिता तुझ्याचसाठी

अहर्निश जरी कष्ट जीवनी असतिल मोठे
आनंदाचे मौल्यवान क्षण तुझ्याचसाठी

शब्द नव्हे, हे अमृत विधिच्या कमलदलातिल
श्रींच्या इच्छेने अवतरले तुझ्याचसाठी

Wednesday, March 14, 2007

सूर्यरथाचा श्लोक

या ब्लॉगमध्ये पूर्वी 'वाहनयोग' या माझ्या लेखात सूर्यरथाचा उल्लेख केला होता, त्यावेळी मला आजोबांनी शिकवलेला श्लोक आठवला नव्हता. काल बाबांनी तो लेख वाचला आणि तो श्लोक मला सांगितला -
-----
रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्तसुरग: ।
निरालम्बो मार्ग: चरणविकल: सारथिरपि ।
रविर्गच्छत्यन्तं प्रतिदिनमपारस्य नभसः ।
क्रियासिद्धिर्सत्वे भवति महतां नौपकरणे ।।
-----
अर्थ:
सूर्याच्या रथाला एक चाक सात आंधळे घोडे आहेत व सारथी पांगळा आहे. असं असूनही आकाशातलं अमर्याद अंतर खंड न करता सूर्यदेव दररोज पार करतात. तात्पर्य, कसोटीला उतरल्यामुळे थोर माणसांची कार्ये तडीस जातात, उपकरणांमुळे नव्हे!

-----



Tuesday, March 13, 2007

तू

लावण्य तू, सौंदर्य तू, विश्वास तू;
आयुष्यातिल अखंडित श्वास तू.

स्वर्गाच्या नगरीची आरास तू;
मोहरल्या कुसुमांत सुवास तू.

पौर्णिमेचे मोहक आकाश तू;
चंद्राचा मंद मंद प्रकाश तू.

अथांग सागरी लाटांची गाज तू;
किरणांचा सप्तरंगी साज तू.

वावरते सदा आसपास तू;
सत्य आहे की मनीचा भास तू?

Thursday, February 1, 2007

निरोप

सासरी जाणार्‍या नवविवाहित मुलीला

मनी लागे हुरहुर मुली जाशी आज दूर
जाउनिया सासरी तू उभारशील संसार
अस्तित्वाने तुझ्या होवो आनंदित तुझे घर
"मुली सुखी हो" इतुका माहेरचा हा आहेर

-----------------------------------
शिक्षण/व्यवसाय इत्यादिंसाठी स्थलांतर करणार्‍या मित्राला/मैत्रिणीला

भैरवीत आजच्या, नांदी उद्याची,
मावळला रवी; उद्या उजळेल प्राची!
गरुडझेप घेउनी वाट चालावी यशाची;
सोबतीस शिदोरी जुन्या आठवणींची.

Sunday, January 7, 2007

शास्त्र आणि कला

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अध्ययनाच्या दृष्टिकोणातून, ज्योतिषशास्त्राला "शास्त्र" म्हणून विद्यापीठांत मान्यता मिळावी किंवा मिळू नये, या विषयावर बरीच चर्चा झाली. त्यात दोन्ही बाजूंनी अनेक मान्यवरांचे विचार प्रकाशात आलेत. शेवटी ती मान्यता मिळाली नाही.

तसं पाहिलं, तर बहुतांश व्यक्तींचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्याचंच आढळेल. ज्योतिषशास्त्राला कटाक्षाने न मानणारे दुर्मीळच आहेत. दैनिक भविष्यावर अगदी विसंबून राहणारे कदाचित कमी असतील. पण कुतुहल म्हणून तरी अनेकजण वर्तमानपत्रातील भविष्य आवर्जून वाचतात. अर्थात, राशिभविष्यात काही अर्थ नसतो, त्यासाठी सूक्ष्म अभ्यास आवश्यक आहे असं अनेक नामवंत ज्योतिषी सांगतात. त्यातील अनेक ज्योतिषांनी अनेकदा आश्चर्यकारक अशी अचूक भविष्यं सांगितल्याचेही अनेक दाखले आहेत.

मग नेमका प्रश्न काय आहे? या कुतुहलापोटी, मी, ज्योतिषशास्त्रावरील काही पुस्तकं वाचायचा निर्णय घेतला. वाचन करता करता त्यातल्या अनेक गोष्टी आवडायलाही लागल्यात. उदाहरणार्थ, कुंडलीतील केवळ सूर्य व चंद्र या ग्रहांच्या स्थितीवरून महिना (मराठी), तिथी व वेळ यांचा सहज बोध होतो. त्यात गुरू, शनी, हर्शल, नेपच्युन, इत्यादि संथगती ग्रहांच्या राशिगत स्थितीवरून नेमके वर्षही कळू शकेल. असो. वाचनानंतर कळलं, की ज्योतिषशास्त्र हा एक अत्यंत व्यापक आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे. फार पूर्वीच त्यात खगोलशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास झाल्याचं समजतं. केवळ सूर्यमालिकाच (Solar system) नव्हे, तर त्याही पलिकडली सविस्तर माहिती त्यात मिळते. त्यामुळे, ज्योतिषशास्त्रातील निदान हा भाग तरी जनसामान्यांपर्यंत पोहचावा असं राहून राहून वाटतं. "फलज्योतिष" हा या शास्त्राचा केवळ एक भाग आहे. त्यातही ग्रहांना राशींचं स्वामित्व देताना पूर्वीच्या ज्योतिषांनी बराच अभ्यास केल्याचं दिसतं. त्यात तर्कशास्त्राचा भागही आहेच.

ज्योतिषशास्त्राचे नवीन ग्रंथ वाचता वाचता सुप्रसिद्ध ज्योतिषी श्रीयुत् व. दा. भट यांचा "असे ग्रह अशा राशी" हा ग्रंथ हाती लागला. त्यात, प्रत्यक्ष अभ्यासाच्या दृष्टीने कुंडली कशी पहावी? याबद्दल उहापोह केला आहे. प्रत्येक कुंडलीसाठी ज्योतिषशास्त्राचे नियम जरी सारखेच असले, तरी ते अचूकपणे वापरणे ही एक कला आहे, असं लेखकानं त्यात म्हटलं आहे. (ज्योतिषशास्त्राबद्दल अधिकारवाणीने बोलण्याची माझी पात्रता नाही, त्यामुळे काही चुकलं असेल तर गुणिजनांनी कृपया क्षमा करावी.) पण या मुद्यावरून एक विचार चमकून गेला. कला म्हणून ज्योतिषशास्त्राकडे बघितलं तर..? "शास्त्र" या शब्दाऐवजी "कला" ही संज्ञा वापरणं कितपत योग्य आहे? इत्यादि. इत्यादि. विचारांचं चक्र सुरू झालं....

भारतात एकूण चौसष्ट कला प्रचलित होत्या, असं म्हटलं जातं. त्या सर्वांची नावं माहित नाही. पण, निदान आजच्या काळात त्यापैकी संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, इत्यादि अनेक कला प्रचलित आहेत. [आधुनिक कलांमध्ये प्रचार (publicity) हीदेखील एक कला (??) आहे, व ती पासष्टावी नसून पहिल्या कलेलाही मागे सारणारी आहे असंही कुठल्याशा दिवाळी अंकात वाचल्याचं मला आठवतंय. असो.] प्रत्येक कलेचं एक शास्त्र आहेच. संगीताचंच पहा ना. रागातील वादी-संवादी स्वर, वर्ज्य स्वर, आरोह, अवरोह, न्यासस्वर, ताल, लय, यांच्या अभ्यासासाठी संगीतशास्त्राचे अनेक ग्रंथ आहेत. पण तास-दीडतास मैफलीत रंग भरणं, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं, खिळवून ठेवणं, ही कला आहे. संगीतातच काय? प्रत्येक कलेतच शास्त्र आहे, नव्हे - प्रत्येक शास्त्रात कला आहे. रांगोळीत रंग भरण्याचं शास्त्र आहे. तरीही, रांगोळी काढणं एक कला आहे. अन्न शिजवण्यासाठी पाकशास्त्र आहे, त्यातही कला आहे. म्हणून, काही स्त्रियाच "सुगरण" असतात. मानवजन्मात धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी शास्त्र आहे. असं असलं, तरी जीवन जगणं ही कलाच आहे.

तात्पर्य, शास्त्र आणि कला या दोन वृत्ती आहेत. "फलज्योतिष" या विषयाकडे कलेच्या दृष्टिकोणातून पाहिले तर "ज्योतिषकला" नामक पासष्टावी (किंवा सहासष्टावी) कलासुद्धा लवकरच जनसामान्यात घर करू शकेल, असं वाटतं.


Monday, January 1, 2007

नव्या वर्षाचे स्वागत

दोन वर्षांचे मीलन, संगम जुन्या-नव्याचा;
साजरा करिती जन, क्षण हा आनंदाचा.

सरले जुने वर्ष, दिन कष्टाचे सरले;
नवे संवत्सर आता, भाग्य घेऊनिया आले.

नव्या वर्षाची चाहूल, नव्या आशा, स्वप्ने नवी;
वठलेल्या वृक्षा आता, फुटेल नवी पालवी.

नव्या वर्षाचा आरंभ, उगवला सूर्य नवा;
घेऊनि आकाशझेप, उडे पाखरांचा थवा.

नव्या वर्षाच्या स्वागता, शीळ घालितसे वारा;
आनंदोत्सवी नाहला, आज आसमंत सारा.