निळ्याभोर नवलाईने पानोपान बहरली झाडे
घालित वाटेवर पायघड्या पडले कुसुमांचे सडे
अंगावर ग्रीष्मात ऊन पडता ही वसुंधरा तापे
लाल, धवल, पिवळ्या, गुलाबी रंगांनी परी नटली रोपे
मध्येच कधी येऊन जाई हळूच एक पावसाची सर
पुन्हा होई आकाश मोकळे पुन्हा पडे ऊन प्रखर
असेच रम्य वातावरण घेऊन आला एक सुटीचा दिवस
भटकंती वाटे करावी, पहावा निसर्ग, फिरावे सहज
क्षणैक होई विचार ऐसा परी मन देई प्रचंड आळस
"शांतपणे बैस घरातच" म्हणे, "कशाला तो उन्हाचा प्रवास?
निसर्ग तो का पळून जाई? होते की दर्शन प्रतिदिन!
गंध फुलांचा दरवळे तोच, काय आज त्यामध्ये नवीन?
नाही आज कामावर जाणे, निवांत मग घ्यावी झोप
रंगीबेरंगी फुलांची स्वप्नातच पहावी महिरप"
No comments:
Post a Comment