मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Monday, May 14, 2007

सावली

कालच "सावली" हा मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला. या चित्रपटाबद्दल अनेक लोकांकडून ऐकलं होतं. खरं तर हा चित्रपट बर्‍याच दिवसांपूर्वी चित्रपटगृहांत लागला होता. माझा पाहण्याचा योग इतका उशिरा आला, कारण आळस! आज जाऊ, उद्या जाऊ, करता करता कालचा रविवार उजाडला. काल बर्‍याच दिवसांनंतर मोकळा रविवारही होता, त्यामुळे चित्रपट पाहण्याचा निर्णय पक्का झाला.

स्वरांच्या रम्य प्रवासात या चित्रपटानं एक गंभीर विषय अत्यंत समर्थपणे हाताळला आहे. संगीताची तपश्चर्या करून लोकप्रिय, नव्हे - लोकमान्य झालेल्या कलाकाराचं अपत्य यात केंद्रस्थानी आहे. एखाद्या कीर्तिमान कलाकाराचं अपत्य जर त्या कलाकाराच्याच मार्गदर्शनाखाली मोठं होत असेल, तर लोक स्वाभाविकपणे या नव्या कलाकाराची तुलना त्याच्या गुरूशी करू लागतात. ही तुलना जरी गुरू-शिष्यांमध्ये असली, तरी या संदर्भात निसर्गत: असलेलं माता-कन्या हे नातं अधिक नाजुक व महत्त्वाचं आहे. माता गुरू असल्यामुळे आपली कन्या आपल्यासारखीच मोठी व्हावी या आईच्या भावनेला गुरूच्या ज्ञानाची जोड मिळते. त्यामुळे मायेच्या ओलाव्यापेक्षा गुरूचा कठोरपणाच वरचढ होतो. कलेत योग्य तर्‍हेने प्रगती होत असूनही मुलीच्या पाठीवर आईची शाबासकी मिळण्याऐवजी या शिष्याच्या वाट्याला गुरूची करडी नजरच येते. इतर समवयस्क गुरूभगिनींना मात्र आईचं प्रेम घरी मिळत असल्यामुळे गुरूचा कठोरपणा इतका जाणवत नाही. शिवाय गुरूचं अपत्य नसल्यामुळे अशी तुलनाही होत नाही. गुरूचं अपत्य असलेल्या या शिष्यावर या सर्वांचा परिणाम होऊन या कलेविषयी मनात एक प्रकारचा तिटकारा जन्म घेतो. हा शिष्य आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतो त्यावेळी गुरूला दुःख होणं स्वाभाविक आहे. पण शिष्याची प्रगती व्हावी हीच गुरूची इच्छा असल्यामुळे, बाहेरून कठोर झालेला गुरू आतून मात्र आपल्या शिष्य असलेल्या अपत्याच्या यशाने सुखावतो व मनातल्या मनात शिष्याला आशिर्वादही देतो.

शिवेन्दु अगरवाल यांची निर्मिती व रजेंद्र तालक यांचं दिग्दर्शन असलेल्या २००६ सालच्या या चित्रपटाची पटकथा प्रतिमा कुलकर्णी यांची आहे. रिमा लागू, अमृता सुभाष, प्रदीप वेलणकर, उर्मिला कानेटकर, स्वप्नील बांदोडकर व अमिता खोपकर हे मुख्य कलाकार आहेत. अशोक पत्की यांचं संगीत दिग्दर्शन, देवकी पंडित यांचा स्वर म्हटल्यावर स्वरांची मेजवानी असणार हे सांगावं लागलं तरंच नवल. शिवाय स्वप्नील बांदोडकर यांचाही पार्श्वगायनात सहभाग आहेच. आरती नायक व जानकी अय्यर यांनी गायलेल्या "सुरजन सो मिला .." या हमीर रागातल्या बंदिशीमुळे सुरवातीपासूनच एक वातावरण निर्मिती होते. आणि या स्वररूपी मंदिराचा सुवर्ण कळस म्हणजे आरती अंकलीकर-टिकेकर व सावनी शेंडे यांनी प्रस्तुत केलेल्या बंदिशी. बंदिशी ऐकताना मनातल्या मनात वाह वा! देत होतो. हा चित्रपट संपू नये असंच वाटत होतं. एका गंभीर विषयाचं इतकं सुरेल प्रस्तुतीकरण खरोखरच अविस्मरणीय आहे. उत्तम कलाकृती दिल्याबद्दल "सावली"च्या संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन.

No comments: