मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Monday, December 24, 2007

सहस्रचंद्रदर्शन

हिंदू संस्कृतीत जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे जन्मदिवस साजरा करण्याची पाश्चात्य पद्धतही भारतात आता चांगलीच रूढ झाली आहे. तरी, निदान काही जन्मदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत अशी विचारधाराही अस्तित्वात आहे व त्यातून एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, इत्यादि सोहळे लोकप्रिय झालेत. संस्कृतीचं जतन करणे ही बाब निश्चितच स्तुत्य आहे. पण, हल्ली प्रत्येक गोष्टीत घाई करण्याची सवय असते त्यानुसार विशेषत: सहस्रचंद्रदर्शनसोहळा लवकर साजरा केल्याचे प्रकार हल्ली अनेकदा घडले. या सोहळ्याविषयी मला काही जेष्ठ व्यक्तींकडून मिळालेली माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेखनप्रपंच. यात कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही.

सर्वप्रथम आपण हिंदू कालगणनेबद्दल थोडी माहिती करून घेऊ. हिंदू कालगणना चांद्र-सौर पद्धतीची आहे. म्हणजे, चांद्रमास प्रचलित असून अमावस्येच्या वेळी सूर्याच्या राशीवरून महिन्यांचं नामकरण केलं जातं. उदा. मीन राशीत सूर्य असताना अमावस्या झाली, की त्यानंतर सुरू होणार्‍या महिन्याला 'चैत्र' हे नाव देण्यात आलं व याप्रमाणे पुढील महिन्यांचं नामकरण केलं गेलं. सूर्य एकाच राशीत असताना दोन अमावस्या झाल्या, तर अनुक्रमे अधिक व निज असे एकाच नावाचे दोन महिने होतात. (उदा. अधिक श्रावण, निज श्रावण.) अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो. याचा अर्थ, हिंदू कालगणनेनुसार तीन वर्षांत १२X३+१ = ३७ महिने येतात. (क्षयमासाचा अपवाद वगळला आहे.) म्हणजे, ३ वर्षांत ३७ पौर्णिमा (३७ वेळा पूर्णचंद्र दिसतो) त्यानुसार ८१ वर्षांत ३७X२७ = ९९९ वेळा पूर्ण चंद्र दिसतो.

याचा अर्थ, पौर्णिमेचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवशी (पंचागानुसार ८१ वर्षे पूर्ण होतात तो दिवस) व इतर कोणत्याही तिथीचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवसानंतर येणार्‍या पहिल्या पौर्णिमेला १०००वा पूर्णचंद्र दिसेल. हाच सहस्रचंद्रदर्शनसोहळ्याचा दिवस.

No comments: