मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, June 29, 2008

रिऍलिटी शो

"कडवट टीकेमुळे स्पर्धक मुलीला नैराश्याचा झटका" ही बातमी ई-सकाळमध्ये वाचली. वाढती लोकसंख्या, वाढती स्पर्धा, वाढत्या महत्त्वाकांक्षा, वाढत्या अपेक्षा..... वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा....

अकराव्या इयत्तेत शिकणार्‍या सिंजिनी दासगुप्ता हिची "राजा मेरी नाच धूम मचा दे" या रिऍलिटी शो मधली कामगिरी न आवडल्याने परीक्षिकेनं दिलेल्या प्रतिक्रियेचा हा परिणाम आहे असं बातमीतून दिसतं. नेमका प्रसंग काय घडला व नेमकं कोण काय बोललं, यापेक्षा, अशा "रिऍलिटी शो"ला आलेलं अवाजवी महत्त्व ही बाब कितीतरी पटीने गंभीर आहे. अशा स्पर्धांमधील विविध पैलूंकडे आता थोडं लक्ष्य देऊ.

"अशा स्पर्धात्मक कार्यक्रमांत मुलांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही, तरी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे." असं सिंजिनीच्या वडिलांचं म्हणणं वरील बातमीत वाचलं. प्रोत्साहन महत्त्वाचं आहेच व परीक्षकांनी सौम्य शब्द वापरावेत हेही मान्य. पण तसं करून तरी हा प्रश्न सुटणार आहे का? साधारणतः वर्षभरापूर्वी झी-टीव्हीवरील "सारेगमप"मध्ये एका व्यक्तीला नैराश्य आलं होतं. त्याही पूर्वी एकदा एका स्पर्धेच्या वेळी "आपली मुलगी जिंकते की नाही" या चिंतेने एका स्पर्धिकेची आई आजारी पडली होती. सुदैवानं ती मुलगी त्या दिवशी जिंकली व तिच्या आईची प्रकृती सुधारली. स्पर्धा म्हटली की इतर स्पर्धकांपेक्षा थोडं कमी, जास्त होणारच. "कामगिरी चांगली झाली नाही" हे परीक्षकांनी कितीही सौम्य शब्दांत सांगितलं, तरी त्या क्षणाला दुःख होणारच. स्पर्धेत यशाप्रमाणेच अपयशही पचवण्याची मानसिक तयारी स्पर्धकाची/स्पर्धकाच्या कुटुंबीयांची असते का? स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टीकोण आपण बदलायला हवा. मानसिकता बदलायला हवी. मागच्या विश्वचषक क्रिकेटमधून भारतीय संघ सुरवातीलाच बाद झाला तेव्हा किती क्रिकेटप्रेमी हा पराभव पचवू शकलेत? स्पर्धेकडॆ/खेळाकडे खिलाडू वृत्तीने आपण का बघू शकत नाही?

"रिऍलिटी शो"मध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांच्या वयाचाही विचार व्हायला हवा. स्पर्धकांचं वय काय? त्यांच्याकडून अपेक्षा काय? अकराव्या इयत्तेतली मुलंमुली जेव्हा स्पर्धेत उतरतात, तेव्हा पौगंडावस्थेत त्यांच्यात होत असलेल्या शारीरिक, मानसिक, वैचारिक बदलांचा विचार केला जातो का? या वयात भावनिक प्रकटीकरणावर नियंत्रण नसतं, नैराश्य, चिडचिड, हळवेपणा अशा अनेक छटा त्यात असतात व सभोवतालच्या टेन्शन्समुळे मन थार्‍यावर नसतं. अशा अस्थिर अवस्थेत त्यांच्याकडून अपयश पचवण्याची अपेक्षा करणं अवाजवी तर ठरत नाहीये ना? या वयात स्पर्धेत भाग घेण्याची पात्रता असते का? या सर्व प्रश्नांवर अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.

अशा या स्पर्धांमधून नेमकं काय साध्य होतं हा एक वेगळाच प्रश्न आहे. स्पर्धा काटेकोरपणे पार पडल्यावर त्यातला "सर्वोत्तम स्पर्धक" विजयी होतो. "सर्वोत्तम" व "चांगला" या शब्दांमध्ये आपण गल्लत करतोय का? चांगला कलाकार निर्माण होण्यासाठी सतत परिश्रम घ्यावे लागतात, चालू ठेवावे लागतात, कलेचं ज्ञान देण्यास योग्य असलेल्या गुरूचं मार्गदर्शन आवश्यक असतं व योग्य वेळ येण्याची वाट पहावी लागते. आज शिकले आणि उद्या सादर केले इतकं सोपं नसतं ते. मुलांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं म्हणजे कलेची साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिलं असा गैरसमज केव्हा दूर करणार आपण? या स्पर्धांमध्ये पोषाख, प्रकाश योजना व "सस्पेन्स" निर्माण करणारी यंत्रणा बंद करावी असं माझं स्पष्ट मत आहे. झी-मराठीवरील "सारेगमप"मध्येही या गोष्टी खूप खटकल्यात. चारचौघात उठून दिसण्याबद्दल आक्षेप नाही, पण स्पर्धा गाण्याची आहे की वेशभूषेची आहे हे आधी स्पष्ट असायला हवं. असो.

स्पर्धेतला विजय जर केवळ सूज्ञ परीक्षकांच्या प्रामाणिक परीक्षणातून मिळणार असेल तर निदान "सर्वोत्तम" ठरलेला हा स्पर्धक काही प्रमाणात तरी चांगला आहे किंवा थोड्या परिश्रमांनी भविष्यात चांगली प्रगती करू शकतो अशी आशा करता येईल. पण दुर्दैवानं तसं होत नाही. "कहानी में ट्विस्ट" येतो तो इथे. या स्पर्धांमध्ये स्पर्धकाचा कलेतला दर्जा ठरवण्यासाठी विशिष्ट पातळीनंतर "परीक्षक" हे पात्र टप्प्याटप्प्याने गौण होत जातं आणि त्याची जागा घेतो "एस्.एम्.एस्." सगळा शाईनिंग इंडिया त्या स्पर्धेत कलेतल्या आपल्या "शायनिंग" ज्ञानाचा प्रकाश टाकून साक्षात् सरस्वतीच्या डोळ्यांत काजवे चमकवतो.

मग प्रश्न पडतो, फक्त कलाकारच "एस.एम्.एस्."ने का निवडले जावेत? डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक इत्यादि लोकंही "एस.एम्.एस्."ने का निवडले जाऊ नयेत? "एस.एम्.एस्." करणारी जनता खरंच इतकी सुज्ञ असेल, तर लोकसभा-विधानसभांच्या निवडणुकींमध्ये "एस.एम्.एस्."ने मतदान करण्याची तरतूद का करण्यात येऊ नये? त्यामुळे भारतीय जनतेचा बहुमोल वेळ वाचेलच, त्याप्रमाणे निवडणूकीतला व त्याआधीच्या प्रचारसभांमधला खर्चही वाचेल. लोकसुद्धा निवडून येणार्‍या नेत्याला पाच वर्षे सहन करायचंय याचा सारासार विचार करूनच "एस.एम्.एस्." करतील.

"रिऍलिटी शो"चं हे महाभारत कधी संपणार? देव जाणे! महाभारतात द्रौपदी वस्त्रहरण झालं, इथे कलोपासनेचं वस्त्रहरण होतंय. महाभारतातल्याप्रमाणे इथे कलेला पणात हरलेला "धर्मराज"ही आहे, वस्त्रहरण करणारा (करणारं?) दुःशासनही आहे, विवश झालेले गुरू व कुटुंबीयही आहेत. राजा तर आंधळाच आहे. कमतरता आहे ती द्रौपदीला वस्त्र पुरवणार्‍या व धर्मयुद्धात धर्माच्या बाजूचं सारथ्य करणार्‍या श्रीकृष्णाची.

5 comments:

A woman from India said...

प्रशांत,
या लेखात अनेक महत्वाच्या विषयांना हात घातला आहे, त्याबद्दल धन्यवाद. स्पर्धा या विषयावर एक लेख लिहायचा विचार मनात होताच. या लेखाच्या निमित्याने तो लेख लवकरच प्रसिद्ध करायचा प्रयत्नं करेन.

Anonymous said...

Alikade asha prakarchya spardhan madhe honare durdaivi prasang pahile ki aaplya kaaljachya tuukdyala asha spardhan madhun pathavnyas uttchhuk aslelya palakanchi kharach keev karavishi watate..tyana councelling chi garaj aahe ki kay ase hi watate.
Ati mahatwakankshe payi aapan aaplya mulache aayushya panala tar laavat nahi na yacha tyanni gaambhiryane vichaar karava..

प्रशांत said...

कसंकाय, t smita,
अभिप्रायांबद्दल धन्यवाद.
कसंकाय,
तुमच्या लेखाची वाट पाहतोय.

आशा जोगळेकर said...

खरंच खूप विचार करायला लावणारा लेख आहे. सूज्ञ पालकांनी विचार करावा. आयाजकांचं लक्ष तर फक्त पैशां कडे च लक्श असतं.

Mugdha said...

महाभारतात द्रौपदी वस्त्रहरण झालं, इथे कलोपासनेचं वस्त्रहरण होतंय>> agadi sahamat..
Chhan lihilat tumhi pan mi kaay kinva tumhi kaay he lihun aapli talmal vyakta karu shakto tyapalikade kahich nahi yachi khanta mala jasta vatate..
majhya blog la bhet dilyabaddal dhanyavad...:)