मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Saturday, March 13, 2010

सौंदर्यामधुन नित्य ती चालते

लॉर्ड बायरन् यांची "शी वॉक्स इन् ब्यूटी" ही कविता इंटरनेटवर मिळाली. आणि स्वैर अनुवाद करण्याची हुक्की पुन्हा आली. यात प्रत्येक ओळीसाठी बाराक्षरी छंद (६+६) वापरला असून शेवटल्या अक्षरांच्या आकार-इकार-उकारांमध्ये मूळ कवितेनुसार (१२१२१२; ३४३४३४; ५६५६५६) यमकांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ कवितेच्या आशयाशी या कवितेचा आशय कितपत जुळतोय हे तुम्हीच ठरवा.

सौंदर्यामधुन नित्य ती चालते,
निरभ्र आकाशी चांदण्यांची रात.
कृष्णधवलांचे लावण्य नांदते,
तिच्या असण्यात, तिच्या नयनांत.
लाभले रात्रीस मंद चांदणे, जे
स्वर्गे नाकारले दिनास प्रदीप्त!

ओज होता न्यून छटा वा अधिक
नासेल क्षणात अमोल रूप, जे
वाहे काळेभोर कुरळ केसांत,
नी तिचा चेहरा मंद तेजाळते.
किती ते लाघवी, निर्मळ, निश्चित!
व्यक्त विचारांचे जणु आगर ते!!

तिच्या गालांवरी नी भुवयांवरी
शांत, हळुवार, तरीही सुस्पष्ट
तेजस्वी कटाक्ष नी हास्य लाघवी
जगले सुखाचे क्षण जे, कथत
सर्वलाभे शांती आत्म्यां लाभलेली
निखळ प्रेमे वा मानस जे व्याप्त.


Saturday, February 27, 2010

तुझे नक्षत्रांचे देणे

शनिवार दि. १३ फ़ेब्रुवारी २०१० रोजी दुपारी ४:०० वाजता घारे सर (गुरुवर्य पं. प्रभाकर परशुराम घारे, सुशील संगीत विद्यालय, घारे गल्ली, छोटी धंतोली, नागपुर) आम्हाला सोडून गेले. मी तेव्हा प्रवासात असल्यामुळे बातमी दोन दिवसांनी कळली. घारे सर आपल्यात नाहीत हे स्वीकारायला अजूनही मन तयार होत नाहीये. त्यांच्याबद्दलच्या भावना शब्दांत मांडणं शक्यच नाही. पण लिहिल्याशिवाय राहावत नाही.....

१९८६ मधली गोष्ट आहे. महिना जुलै की ऑगस्ट ते आठवत नाही, पण शाळा सुरू होऊन थोडेच दिवस झाले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास आई मला घारे सरांकडे घेऊन गेली होती. तेव्हा मी सात वर्षांचा होतो. लहानपणी माझा आवाज "गोड" होता असं आमच्याइथे काही लोकांना वाटायचं, म्हणून घारे सरांकडे गायन शिकण्याकरता मला भरती केलं. मला मात्र गाणं शिकणं फारच कंटाळवाणं वाटायचं. कदाचित् गायन शिकायला सगळ्या मुली आणि मी एकटाच मुलगा हेही एक कारण असावं. शिवय, तिथे क्लासमध्ये व्हायोलिन, सतार, तबला अशी वाद्य दिसायची आणि गाण्याच्या विद्यार्थ्यांना सर वाद्यांना हात लावू देत नसतं म्हणून कदाचित् आपण एखादं वाद्यच शिकायला हवं असं तेव्हा वाटायचं. त्यामुळे प्रारंभिक आणि प्रवेशिका प्रथम या परीक्षा झाल्यानंतर गाण्याच्या क्लासला जायचा कंटाळा केला. मग नेमकं काय झालं ते आठवत नाही, पण जवळजवळ वर्षभराच्या गॅपनंतर व्हायोलिन शिकायला पुन्हा घारे सरांकडे जायला सुरुवात झाली.

व्हायोलिनचा क्लास सुरू झाला तो दिवस मी विसरू शकत नाही. तो दिवस होता १ एप्रिल १९८९. वेळ सकाळी ७ वाजता. सरांनी एक व्हायोलिन हातात दिलं. मी ते सारंगीसारखं पकडलं. नंतर त्यांनी व्हायोलिन कसं पकडायचं, बो कसा धरायचा वगैरे सांगितलं, आणि एकेका तारेवर डावीकडून उजवीकडे/उजवीकडून डावीकडे बो सरळ चालवणे आणि टोकाशी आल्यावर तार बदलणे हा पहिला धडा दिला. याची प्रॅक्टिस जवळजवळ आठवडाभर चालली. नंतर सा रे ग म प ध नि सां कसं वाजवायचं ते शिकवलं आणि असं करता करता भूपाली रागापर्यंत प्रगती झाली. मग गायनात शिकलेले काही राग व्हायोलिनवादनाच्या वेळी नव्याने भेटले. आणि हळूहळू व्हायोलिन क्लास आवडू लागला.

क्लासला उन्हाळ्याची महिनाभर सुटी असायची. वर्षभरानंतर सुटी सुरू झाली होती तेव्हा घरी रियाज़ करायला क्लासमधलं व्हायोलिन एक व्हायोलिन घेऊन जा असं महिनाभर आधी सरांनी सुचवलं होतं. शेवटच्या दिवशी तर चक्क नवीन व्हायोलिन सरांनी दिलं, आणि म्हणाले की हेच व्हायोलिन तू विकत घे. पैसे नंतर दिलेस तरी चालेल. माझं स्वतःचं व्हायोलिन मिळालं याचा आनंद ओसंडून वाहत होता. घरी घाईघाईने येऊन आईबाबांना सांगितलं. त्यांनी ताबडतोब पैसे दिले. अजूनही तेच व्हायोलिन आहे माझ्याकडे. तेव्हा फक्त साडेपाचशे रुपये किंमत होती त्याची.

घारे सरांचा स्वभाव हलका फुलका होता. विद्यार्थ्यांची वाजवताना कधी चूक झाली तरी रागवण्याऐवजी "शाबास" असं मिश्किलपणे म्हणायचे. काहीतरी चुकलंय हे आम्हाला लगेच कळायचं. आपल्याला येत नाही असं कोणाला जर फारच वाटलं तर त्याच्यासमोर सर त्यांचे चुना-तंबाखूचे डबे ठेवून बोटाने डबे दाखवत म्हणायचे - "हे (पहिला डबा) असं असतं, म्हणून हे (दुसरा डबा) असं असतं. हे असं नसतं तर हे असं झालं असतं का? मुळीच नाही. (पॉज़ घेऊन) म्हणून हे असंय." विशारद होईपर्यंत शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताव्यतिरिक्त इतर काही वाजवायला सरांनी मनाई केली होती. याला अपवाद फक्त एकच. शाळेमध्ये स्नेहसंमेलन किंवा इतर काही कारणास्तव संगीताचा कार्यक्रम असेल तर तिथे सुगम संगीत वाजवायला फुल परमिशन होती. एकदा शाळेत स्नेहसंमेलनाच्या प्रॅक्टिसच्या वेळी व्हायोलिन ट्यून करण्याचं धाडस केलं होतं आणि दोन तारा तोडल्या होत्या. आता आपलं व्हायोलिन कामातून गेलं असं वाटून तेव्हा खूप भीती + दुःख झालं होतं. शाळेतून घरी न येता थेट क्लासमध्ये गेलो आणि सरांना सगळं सांगितलं. सरांनी मला शांत केलं आणि ताबडतोब त्यांच्याकडच्या दोन तारा लावून दिल्या. दुसऱ्या दिवशी व्हायोलिन कसं लावायचं याचंही ट्रेनिंग मिळालं. गुरू म्हणूनच नव्हे, पण वडिलधारी व्यक्ती म्हणूनही त्यांनी अनेकदा मला मार्गदर्शन केलं, मदत केली आणि सांभाळूनही घेतलं. आरतीताईच्या लग्नासाठी घरी पाहुणे जमले होते तेव्हा गाण्याचा अनौपचारिक कार्यक्रम झाला होता. तेव्हा सुहासदादाचं लग्नही २-३ दिवसांवर आलं होतं. तबलावादनाची सोय होती पण तबला मिळत नव्हता. पण तेव्हासुद्धा क्लासमधला तबला सरांनी दोन दिवसांकरता दिला होता.

संगीत नादमय असलं, तरी त्यातला "शास्त्र" हा भाग तुलनात्मक रटाळ आहे. पण ते शिकवतानाही अशी काही उदाहरणं सर द्यायचे, की हसत खेळत त्याचा अभ्यास व्हायचा. उदा. "लय" हा शब्द ऐकला की "लय पावणे" हा वाक्प्रचार आठवतो आणि हसू येतं. रागांचे गानसमय आणि त्यातल्या बंदिशींवरचं सरांनी सांगितलेलं नेहमी आठवतं. भैरव, विभास, देशकार या रागांमध्ये गायी चरायला जातात अशा आशयाच्या बंदिशी रचल्या जाऊ शकतात. त्याच बंदिशी जर मारवा, पूरियाधनाश्री, भूपाली, यमन मध्ये वापरायच्या असतील, तर चरायला जाण्याऐवजी गायी घरी परतायला हव्या. ललित, शुद्ध सारंग मध्ये "तपन लागी" असे शब्द असणं अगदी स्वाभाविक आहे ही बंदिश फारतर पटदीपमध्ये बसवता येईल, पण बागेश्री, मालकंसमध्ये हे शब्द नाही चालायचे. सोहोनी मधलं "काहे अब तुम आये हो"वर सर म्हणाले, की सोहोनी रागाच्या वेळी कोणीही घरी आलं तरी "काहे अब तुम आये हो?" हाच प्रश्न पडेल. तेव्हा सगळेजण मनसोक्त हसले होते.

सुशील संगीत विद्यालयातला सर्वाधिक लक्ष्यात राहिलेला काळ म्हणजे १९९६-१९९८. या काळात आम्ही १०-१२ विद्यार्थी (व्हायोलिन, गायन, तबला) मध्यमा पूर्ण ते विशारद या वर्षांमधले होतो. त्यावेळी दर महिन्यात किमान एकदा कोणाकडेतरी एकत्र जमायचं आणि १५-२० मिनिटांसाठी एखादा राग प्रस्तुत करायचा असं ठरवलं आणि दीड वर्षांच्या काळात जवळ जवळ २५ वेळा संगीतसभा झाली. प्रत्येक संगीतसभेच्या शेवटी सरांचं व्हायोलिनवादन आणि त्यानंतर अल्पोपहार असा हा उपक्रम होता. या उपक्रमामुळे संगीताबद्दल गोडी वाढलीच, पण कलासादरीकरणातला प्रोफ़ेशनल दृष्टिकोण कळू लागला. या उपक्रमातलाच एक कार्यक्रम कोराडीमध्ये झाला आणि त्यानंतर सुशील संगीत विद्यालयाची कोराडी शाखा सुरू झाली! सर स्वतः बसने कोराडीला जाऊन आठवड्यातून दिवस क्लास घ्यायचे! जवळ जवळ दोन वर्षे कोराडीमध्ये क्लास होत होता, पण जास्त दगदग होऊ लागल्याने हळूहळू बंद केला. नंतर कोराडीचे विद्यार्थी छोट्या धंतोलीत क्लाससाठी येऊ लागले.

सर विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये इतके मग्न असायचे की विद्यार्थ्यांकडून महिन्याची फी घेणे वगैरे कशातच त्यांचं लक्ष्य नसायचं. क्लासमध्ये ते इतका वेळ देऊ शकत होते त्यामागे त्यांचं जेवढं समर्पण होतं, तेवढंच काकूंचं (सौ. सुशीला प्रभाकर घारे). घराची आणि क्लासमधल्या व्यावहारिक गोष्टींची पूर्ण जबाबदारी काकू समर्थपणे चालवत होत्याच, शिवाय खंबीरपणे सरांच्या पाठीशी होत्या. उपांत्यविशारदची परीक्षा होती तेव्हा काकू हॉस्पिटलात होत्या. नंतर सहा-आठ महिने त्या आजारीच होत्या. पण त्या परिस्थितीतही सरांना क्लास सुरू ठेवण्याचा आग्रह करायच्या. अगदी काकूंच्या निधनाच्या दिवशी दुपारपर्यंत क्लास सुरूच होता. काकूंची तब्येत शेवटी शेवटी खूपच नाजुक झाली होती. पण तशाही परिस्थितीत सर आणि खरंतर सर्वच घारे कुटूंबीय हसतमुख होते. याच दिवसांमध्ये इंडियन म्युझिक एज्युकेशन सोसायटीने शास्त्रीय संगीताची स्पर्धा आयोजित केली होती. तिथे सरांच्या सल्ल्यानुसार मी भाग घेतला होता आणि पहिलं पारितोषिकही मिळालं होतं. त्यानंतर क्लासमध्ये आलो होतो तेव्हा काकूंना सलाईन लावलं होतं आणि हालचालही करता येत नव्हती. पण माझं कौतुक त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं.
नंतर दोन-तीन दिवसांतच काकू आम्हाला सोडून गेल्या.

काही दिवसांनी क्लास पुन्हा सुरू झाला. आमच्या १०-१२ विद्यार्थ्यांपैकी काहींची विशारदची परीक्षा झाली आणि काहीजण पोटापाण्यासाठी परगावी गेले त्यामुळे मासिक संगीत सभांचा उपक्रम मात्र बंद पडला. १९९९मध्ये मीही उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेलो. पुण्याला जायला निघालो होतो तेव्हा सरांनी एक-दोन पत्ते दिले होते. "पुण्याला मोठा गुरू मिळेल पण एकदम कोणाकडे जाण्यापूर्वी यांपैकी कोणाकडे तरी विचार. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम इथेही शिकवला जातो, त्यामुळे यांच्याकडून योग्य सल्ला मिळेल असं मला वाटतं." - सर. सरांकडून पत्ते घेतले खरे, पण माझ्याकडून हालचाल व्हायला वेळ लागला. रियाज कमी होत होता. पुढे सरांच्या पंच्याहात्तरी निमित्त नागपूरला कार्यक्रम झाला होता त्यात मला व्हायोलिन वाजवायला संधी मिळाली आणि पुन्हा व्हायोलिनची प्रॅक्टिस जोरदार सुरू झाली. नागपूरहून पुण्याला परतल्यावर मात्र सरांनी दिलेल्या पत्त्यांवर संपर्क करायचाच असा निश्चय केला आणि एक दिवस गोडसे व्हायोलिन विद्यालयात गेलो. तिथल्या सरांनी माझं व्हायोलिन ऐकलं आणि उ. फ़ैयाज़ हुसेन खाँसाहेबांकडे जाण्याचा सल्ला दिला. घारे सरांना मी हे सांगितलं तेव्हा त्यांनी अभिनंदन केलं आणि म्हणाले, की गोडसे यांनी योग्य मार्गदर्शन केलंय. पूर्वी पुण्यात कार्यक्रम झाला असताना घारे सरांच्या भाच्याने खाँसाहेबांकडून बो आणून दिला होता हे त्यांनी आवर्जून सांगितलं. उ. फ़ैयाज़ हुसेन खॉंसाहेबांकडे क्लास सुरू होण्यापूर्वी घारे सरांनी मला उपदेश केला होता - प्रशांत, तिथे जाशील तेव्हा ते सांगतील ते नीट ऐकायचं आणि इथे मनापासून शिकायचास तसंच शिकायचं. त्यांनी काही सांगितल्यावर "माझे सर असं म्हणायचे" वगैरे कधीही बोलायचं नाही आणि तसा विचारही करायचा नाही. तरच त्यांची शैली, त्यांचं ज्ञान तुला संपादन करता येईल. घारे सरांच्या या मोलाच्या सल्ल्यामुळे उ. फ़ैयाज़ हुसेन खॉंसाहेबांसारखे जेष्ठ कलाकार मला गुरू म्हणून लाभले.

मी पुण्याला असताना एक-दोनदा घारेसर माझ्याकडे आले होते. घारे सर पहिल्यांदा आले होते तेव्हा सर (खॉंसाहेब) मुंबईला गेले असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. पण पुढल्या खेपेत दोन गुरूंची भेट घडवू शकलो याचं समाधान आहे. २००७ मध्ये खॉंसाहेबांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कार वितरण सोहळा नागपूरमध्ये वसंतराव देशपांडे सभागृहात झाला होता तेव्हा पुन्हा खॉंसाहेबांची आणि घारे सरांची भेट झाली. मी अमेरिकेला जाण्यानिमित्त व्हिसाच्या गडबडीत असल्यामुळे नागपूरला जाऊ शकलो नव्हतो. नागपूरच्या भेटीच्यावेळी घारे सरांची तब्येत खूपच खालावली होती. दम्याच्या त्रासामुळे ते हॉस्पिटलमध्येच होते. खॉंसाहेब (सर) अजूनही त्या भेटीबद्दल अधुनमधून सांगत असतात. घारे सर आणि खॉंसाहेब उ. फ़ैयाज़ हुसेन खाँ हे दोन्ही कलाकार मला गुरू म्हणून लाभले हे माझं भाग्य आहे.

घारे सरांच्या इतक्या आठवणी आहेत, की शब्द अपुरे पडतील. त्यांची उणीव तर सदैव जाणवत राहील. सर प्रत्येक परिस्थितीत हसतमुख राहिले आणि मृत्यूलाही हसत हसत सामोरे गेले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

२१ डिसेंबर २००८ रोजी घारे सरांना भेटलो होतो तेव्हा त्यांचं व्हायोलिनवादन रेकॉर्ड करून त्यांच्या परवानगीने यु-ट्यूबवर उपलब्ध केलं होतं.
८३ वर्षांच्या सरांनी तेव्हा २-३ मिनिटांसाठी एक-एक राग या प्रमाणे तीन रागांची झलक प्रस्तुत केली होती. रसिकांसाठी त्या क्लिप्स इथे देत आहे.

१. राग मारुबिहाग

२. राग शिवरंजनी

३. राग बिलासखानी तोडी






तबला साथ - श्री. सुहास घारे
व्हायोलिन साथ - प्रशांत मनोहर

रेकॉर्डिंग - कु. श्रेया सुहास घारे

Saturday, January 30, 2010

मांडवपरतणी

नव्या गावी जाणे आले
चालणे शोधीत वाट
मागे वळून पाहता
दिसे धुके घनदाट

नव्या गावामध्ये माझ्या
सारेच दिसे नवीन
पोचताच दिमाखात
स्वागत करती जन

सरबराई होतसे
प्रेमाने भरभरून
जुन्या आठवांत पण
आज हरवले मन

फिरूनिया एकदाच
मन जाई जुन्या गावा
सग्यासोयर्‍यां भेटून
क्षणभर घे विसावा

घेई गगनभरारी
विसावून क्षणभर
नवे गाव वाटू लागे
प्रेममायेचे आगर

जुने वाटे दूर आता
वाटे हेच माझे घर
नवीन गावच माझी
स्वप्ने आता साकारेल

Thursday, December 10, 2009

बदक आणि राजहंस













"नको लाजवु बदकास राजहंसा
पुरे आता लटकी तुझी प्रशंसा
दैवयोगे तू हंस जाहलासी
मित्र बदकाला परी विसरलासी

लाभली तुजला मान डौलदार
मानसी तूझा त्यामुळे विहार
रसिकजन ते भाळले मानसाला
राजहंसाचा होय बोलबाला."

राजहंसाला बदक वदे ऐसे
हंसमन ते जाहले हरवलेसे
आठवे त्याते बाल्य लोपलेले
कुरूपाला तै लोक हासलेले

मित्र बदकाला राजहंस बोले,
"स्मृती बाल्यातिल आठवू नको रे
जरी मैत्री दृढ आपुली असे रे
भेटता दोघां यातना किती रे!

कटू बाल्यावर सोडिले जळासी
रसिकजन मी रिझविले मानसासी
जाणतो मी, लटकी असे प्रशंसा
मानसास्तव पाहती राजहंसा

जोवरी माझी डौलदार मान
तोवरी माझा मानसात मान
लोपता हे सौंदर्य विसरतील
बदकरूपाते कोण भाळतील?

क्षणिक प्रेमाला मला चाखु दे रे
असे मिथ्या जरि, सौख्य भोगु दे रे
तयानंतर मानसास त्यागून
तुझ्या दारी शेवटी विसावेन."

नमन तुला मयूरेश्वरा

नमन तुला
वक्रतुंडा गणेशा
मयूरेश्वरा

नमन तुला
एकदंता गुणेशा
मयूरेश्वरा

नमन तुला
ढुंढे कृष्णपिंगाक्षा
मयूरेश्वरा

नमन तुला
विघ्नहर्त्या विकटा
मयूरेश्वरा

Sunday, November 22, 2009

प्रवास

मजसाठी जेव्हा वाट ही संपणार
मावळेल भास्कर अन् होइल अंधार
सोपस्कार नको मजला काळोखातिल
का खंत करावी कुणी मुक्त झाल्यावर?

मज स्मरा तुम्ही परि थोडक्याच वेळाला
नच अश्रू ढाळा आणिक मज स्मरताना
आठवा प्रेम जे दिले-घेतले आपण
आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण

हा प्रवास अपुल्या सर्वांना अनिवार्य
एकटेच जाणे पुढे, संपता कार्य
चालला खेळ हा मोठ्या दरबारातिल
जाण्यासाठी स्वगृही एक हे पाउल

एकाकी वाटुन मन होता कधि हळवे
भेटण्या सोयर्‍यासग्यांस तेव्हा जावे
अश्रु सुकवा त्यांच्यात प्रेम वाटून
आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण


एड्गर अल्बर्ट गेस्ट यांची "मिस मी, बट लेट मी गो" ही कविता काही दिवसांपूर्वी वाचली आणि अनुवाद करण्याचा मोह अनावर झाला. गेस्ट यांची क्षमा मागून या ब्लॉगवर हा स्वैर अनुवाद प्रकाशित करतो.

Wednesday, October 7, 2009

राम-कृष्ण तौलनिक मुक्तचिंतन आणि रामाचं अवतारकार्य

सूचना: या लेखाचं मूळ प्रकाशन - ऑर्कुटवरील कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समूहातर्फे प्रकाशित "अंतर्याम" मासिकाचा ऑक्टोबर २००९ अंक (दिवाळी विशेषांक)

श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी राम आणि कृष्ण हे दोन अवतार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. महाभारतात अर्जुनाला गीतेचा उपदेश करताना "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति" असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे. अर्थात धर्मसंस्थापना आणि दुष्कृतींचा नाश ही या अवतारांमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. रामाआधी विष्णूचा "परशुराम" हा अवतार होता. परशुराम चिरंजीव आहे असं मानलंय. मग विष्णूला रामाचा अवतार घेण्याची गरज का पडली असावी? असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. या अवतारांमागील ढोबळ उद्दिष्ट जरी एक असलं, तरी त्यात परिस्थितीजन्य फरक होते. ज्याप्रमाणे रोगाने ग्रस्त असलेल्या शरीरात आरोग्यस्थापना करण्यासाठी त्या रोगानुसार औषधाची योजना होते, त्याप्रमाणेच विष्णूने आपलं अवतारकार्य समाजात धर्माची ग्लानी झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार निश्चित केलं असावं. सीतास्वयंवराच्या वेळी रामाने शिवधनुष्य तोडल्यावर रामाची व परशुरामाची प्रत्यक्ष भेट झाली. विष्णूच्याच दोन अवतारांचं असं समोरासमोर येण्याचा हा क्षण एकमेवाद्वितीयच होता. रामात जन्मापासून विष्णूचा अंश होताच. या भेटीत शक्तिसंक्रमणाद्वारे परशुरामातला विष्णूचा अंशदेखील रामाकडे गेला. परशुरामाचं अवतारकार्य संपलं आणि रामाचं अवतारकार्य सुरू झालं याचे संकेत या क्षणाने दिले. रामात आणि परशुरामात विष्णूचे "अंश" होते, पण कृष्णात विष्णूचा अंश नसून स्वतः विष्णूच कृष्ण म्हणून पृथ्वीवर अवतरले होते. त्यामुळे कृष्णाला पूर्णावतार मानलं जातं.

राम आणि कृष्ण या दोन अवतारांमध्ये काही घटनांमध्ये साधर्म्य आहे. राम रावणाचा वध करतो आणि बिभीषणाला लंकेचा राजा बनवतो. कृष्ण कंसाचा वध करतो आणि उग्रसेनाला मथुरेचा राजा बनवतो. दोन्ही प्रसंगांमध्ये खलनायकाच्या वधानंतर त्याचं राज्य स्वतः न स्वीकारता राज्यातल्याच "योग्य" व्यक्तीला सुपूर्त करून स्वतः अलिप्त राहणे हे साम्य चटकन नजरेस पडतं. राम एकपत्नी होता. कृष्णाला मात्र सोळाहजार एकशे आठ बायका होत्या असं मानलं जातं. या संदर्भात काही वर्षांपूर्वी पुण्यात योगेश्वर प्रतिष्ठान, कोथरूड तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एका कार्यक्रमात राहुल सोलापुरकर यांनी आकर्षक माहिती दिली होती - "बालक जन्माला येतं तेव्हा निरोगी आणि सुदृढ असल्यास त्याच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांची संख्या सोळाहजार एकशे आठ इतकी असते. (पूर्वीच्या काळातल्या संस्कृतीनुसार) पत्नी ज्याप्रमाणे पतीच्या नियंत्रणात असते, आधीन असते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने योगसामर्थ्याने या सोळाहजार रक्तवाहिन्या आपल्या नियंत्रणात ठेवल्या होत्या. म्हणून त्यांना श्रीकृष्णाच्या बायका म्हटलं आहे. आणि श्रीकृष्णाला योगेश्वर म्हटलंय." सोळाहजार बायका असूनही श्रीकृष्णाचा उल्लेख फक्त 'राधेश्याम' असाच का बरं होतो? याबद्दल श्री. सोलापुरकर पुढे म्हणाले - "मानवी शरीरात मस्तकात चैतन्याचा स्त्रोत असतो त्याची धारा अधोगामी असते. कुंडलिनी शक्ती मूलाधारचक्रापाशी स्थित असते. चैतन्याची अधोगामी 'धारा' कुंडलिनी शक्तीला जागृत करून उलटगतीने 'राधा' बनून मस्तकाकडे परतते. या कुंडलिनीरूपी राधेवर कृष्णाची प्रीती होती आणि 'धारा'चं 'राधा' करण्याचं त्याचं योगसामर्थ्य होतं. म्हणून "राधाधर", "राधेश्याम" अशा नावांनी श्रीकृष्णाचा उल्लेख केला जातो."

महाभारताचं कथानक कौरव-पांडवांवर केंद्रित असल्यामुळे आणि कंसाचा वध कृष्णजन्मानंतर काही वर्षांतच झाल्यामुळे कृष्णाची महत्त्वाची भूमिका असूनही तो महाभारतातलं मुख्य पात्र नव्हता. नंदगावात असतानाच्या कृष्णलीला किंवा नंतरच्या काळातल्या शिशुपालवध, द्रौपदी वस्त्रहरण, द्रौपदीची थाळी, इत्यादि लहानसहान कथा कृष्णाशी निगडित असल्या, तरी एकूण अवतारकार्यातल्या या प्रसंगांची तुलना रामायणातल्या त्राटिका वध, अहल्येची श्यापमुक्ती, वालीवध, अशा तुलनात्मक कमी महत्त्वाच्या प्रसंगांशीच करावी लागेल. महाभारतात कंसवधानंतर कृष्ण खर्‍या अर्थाने झळकतो तो थेट पांडवांच्या अज्ञातवासानंतरच्या काळात. कुठल्याही समस्येवर युद्ध हा अंतिम मार्ग मानला आहे. धर्मयुद्ध टळावं यादृष्टीने पांडवांचा शांतिदूत बनून स्वतः श्रीकृष्ण हस्तिनापुरात जातो. तरीसुद्धा दुर्योधन युद्धाच्याच हट्टाला अडून बसतो. तिथे राजसभेमध्ये कृष्ण आपल्या असामान्य सामर्थ्याची चुणूक 'कृष्णशिष्टाई'द्वारे दाखवतो. रामायणात रामाने युद्धापूर्वी "शेवटचा करि विचार फिरुन एकदा" असं म्हणून शरण येण्यासाठी रावणाला एक संधी दिली होतीच. कृष्णशिष्टाईशी साधर्म्य असलेला प्रसंग रामायणात नसला, तरी रामाचा दूत म्हणून सीतेला भेटायला लंकेत पोहोचलेल्या हनुमानाने लंका जाळली तो प्रसंगही अलौकिक होता. (लंकादहन व कृष्णशिष्टाई या दोन्ही गोष्टी पूर्वनियोजित नव्हत्या.)

शांततेचा प्रस्ताव मांडल्यानंतरसुद्धा कौरवांनी युद्ध पुकारल्यामुळे त्या परिस्थितीत क्षत्रियधर्म म्हणून युद्ध करणंच योग्य आहे असा उपदेश अर्जुनाला श्रीकृष्णाने केला, हाच कृष्णाचा अवतारकार्यातला मुख्य भाग म्हणावा लागेल. आपल्या लोकांना क्षमा करावी, पण सुधारण्याची संधी दिल्यावरही ते सुधारायला तयार नसतील किंवा अधर्माला पाठिंबा देत असतील, तर त्यांना शासन केलंच पाहिजे आणि तसं करताना "हा माझा अमुक अमुक.." वगैरे नातेसंबंध आड येता कामा नये हा महत्त्वाचा संदेश भगवद्गीतेत मिळतो.

भावार्थ दीपिका, गीतारहस्य इत्यादि भाष्यांद्वारे भगवद्गीता बहुचर्चित असल्यामुळे कृष्णाचं अवतारकार्य ठळकपणे समोर येतं. रामाचं अवतारकार्य त्या तुलनेत कमी चर्चिलं गेलं. रामायणात रावणाचा वध कथानकाच्या जवळजवळ मध्यभागी झाल्यामुळे "रावणवध" हेच रामाचं मुख्य अवतारकार्य आहे असा प्रथमदर्शनी समज होतो. रावणवध आणि कंसवध यांमध्ये दुष्कृतींचा विनाश होता आणि त्यानंतर अनुक्रमे, लंकेत आणि मथुरेत धर्मसंस्थापना झाली हे जरी खरं असलं, तरी महाभारतकथा हस्तिनापुरावर केंद्रित आहे त्याप्रमाणे रामायणाची कथा अयोध्येवर केंद्रित होती. रावणवध झाल्यावरही रामायणात अजून अयोध्येचा प्रश्न सुटलेला नव्हता. रामाचं अवतारकार्य भगवद्गीतेएवढं लोकप्रिय होऊ शकलं नाही. किंबहुना, उत्तररामायणात रामाने सीतेचा त्याग केल्यामुळे रामाचं कार्य बाजूला पडून जनसामान्यांच्या नजरेत राम जणु खलनायक होऊन बसला.

रामाने सीतेचा त्याग केला यात लौकिकार्थाने सीतेवर रामाने अन्याय केला असा समज होतो. पण ही गोष्ट वाटते तेवढी सरधोपट नाही. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी, ती म्हणजे राम हा विष्णुचा अवतार आहे आणि धरणीकन्या सीता म्हणजे लक्ष्मीचंच रूप आहे. संपूर्ण विश्वाचं पालन करणार्‍या विष्णुला आणि लक्ष्मीला संसार करण्यासाठी पृथ्वीवर येण्याची काय आवश्यकता असणार? त्यांनी अवतार घेतले ते विशिष्ट प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच. आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर एकाच कार्यालयात एखाद्या प्रकल्पावर काम करणारे आदर्श सहकारी एकमेकांचे नवरा-बायको असले तरी कार्यालयात असताना आपापल्या कामांशी जसे एकनिष्ठ असतात तसेच विष्णू-लक्ष्मी त्यांच्या अवतारांमध्ये आपापल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ होते. संपूर्ण रामायणात "कर्तव्यपालन" ही भावना रामाच्या आणि सीतेच्या वर्तनातून व्यक्त होते. रामाने वनवास स्वीकारला कारण पित्याची आज्ञा पाळणे हे कर्तव्यच होतं. मंथरा ही कैकेयीची दासी होती. तिने कैकेयीचे कान भरले हे रामाला कळलं नसेल का? पण ते फक्त निमित्तं होतं. रावणवध होण्याकरता ही घटना घडणं आवश्यकच होतं. शिवाय एखाद्या माणसाचं नसणं त्याचं महत्त्व जितक्या चांगल्या रीतीने पटवून देतं, तितकं तो जवळ असताना ध्यानात येत नाही हेही राम जाणत होता. अर्थातच तेही साध्य झालं. रावणाचा वध होण्यासाठी केवळ राम वनवासाला जाऊन उपयोग नव्हता; सीतेलाही त्याच्याबरोबर जाणं आवश्यक होतं. "निरोप कसला माझा घेता" या गाण्यात सामान्य पत्नीचे विचार मांडण्यात आले असले तरी "जेथे राघव तेथे सीता"मध्ये सांकेतिक भाषेत सीतेला वरील गोष्ट तर सुचवायची नसेल?

वनवास संपवून अयोध्येत परतल्यावर अयोध्येचं राज्यपद रामाने स्वीकारलं. सीतेच्या पावित्र्याबद्दल रामाला अजिबात शंका नव्हती. रामाला शंका असती तर चारचौघांसमोर अग्निपरीक्षा देण्याआधी सीतेला रामासमोरच ती इतरांच्या अपरोक्ष द्यावी लागली असती. राम अयोध्येचा राजा होता. आजच्या भारतातल्या राजकीय व्यवस्थेनुसार पाहिल्यास राम राष्ट्रपती होता, पंतप्रधानही होता आणि सर्वोच्च न्यायालयातला मुख्य न्यायाधीशदेखील. सीता अयोध्येची राणी, राज्यातली उच्च पदस्थ व्यक्ती होती - आजच्या राजकीय परिभाषेनुसार केबिनेट मिनिस्टर होती. धोबी हा अयोध्येतला सामान्य नागरिक – आम आदमी. त्याला सीतेच्या चारित्र्याविषयी शंका आली, म्हणून त्याच्या समाधानासाठी रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. ही पतीने पत्नीला सांगितलेली अग्निपरीक्षा नसून केबिनेट मिनिस्टरवर आरोप झाल्यामुळे त्याचा न्यायनिर्वाळा करण्यासाठी न्यायाधीशाने मागितलेले पुरावे होते. अग्निपरीक्षेनेही धोब्याचं समाधान झालं नाही त्यामुळे अयोध्येचा राजा या नात्याने (आजच्या परिभाषेत पंतप्रधानाच्या भूमिकेतून) रामाने सीतेला 'राणी'पदावरून काढाव लागलं. त्या काळात राजाच्या पत्नीला 'राणी' व्हावंच लागत असल्यामुळे तिचा त्याग करावा लागला. तिला त्यागल्यानंतर रामाने दुसरा विवाह केला नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही. सीतेला त्यागलं तेव्हा ती गरोदर होती हेही रामाला माहिती होतंच. त्यामुळे तिच्यासाठी योग्य ती सोय वाल्मिकी आश्रमात करण्यात आली होती. तिचं गर्भारपण हेसुद्धा राम आणि सीता यांचं कर्तव्यचं होतं - अयोध्येचं राज्य सोपवण्यासाठी वंशवृद्धी आवश्यकच होती. सीतेला त्यागलं नसतं, तर भविष्यात कदाचित् त्या संततीच्या औरस असण्याबद्दलही अयोध्येतल्या आम-जनतेने शंका व्यक्त केली असती आणि त्या परिस्थितीत लवांकुशांवर राज्यकारभार सोपवणं अशक्यप्राय झालं असतं. त्यामुळे सीतेचं अयोध्येपासून दूर असणंच हितावह होतं. यानंतर लवांकुशांना जन्म देऊन त्यांना योग्य वेळी रामाकडे सुपूर्त करणे एवढंच सीतेचं अवतारकार्य उरलं होतं. यथाकाल तो दिवसही उजाडला. सीतेने अग्निपरीक्षा देऊनही पूर्वी धोब्याचं समाधान झालं नव्हतं हे राम विसरला नव्हता. लवांकुशांना भविष्यात राज्यकारभार सोपवायचा होता. तेव्हा त्यांना रामाने जरी स्वीकारलं असलं तरी अयोध्यावासियांच्या मनात कुठलाही किंतू राहू नये म्हणून अयोध्यावासियांसमक्ष सीतेला रामाने तिच्या पावित्र्याबद्दल पुन्हा प्रश्न (मुद्दाम) विचारला. आणि "वन्स फ़ॉर ऑल" उत्तर म्हणून धरणीमध्ये सीता विलीन झाली... तिचं अवतारकार्य तसंही संपलंच होतं तेव्हा. "मज आणुनि द्या तो हरिण अयोध्यानाथा" आणि "डोहाळे पुरवा" या प्रसंगांमध्ये वर वर पाहता सीतेचा अल्लड स्वभाव दिसत असला तरी त्यांमध्ये सीतेने रामाला कर्तव्याची आठवण करून दिली आहे. रामायणात सीता जणु कर्तव्यनिष्ठेचा एक मापदंडच होती. सीतेचा उल्लेख "रामपत्नी सीता" असा फार कमीवेळा आहे. रामाचा उल्लेख मात्र सदैव "सीतावर", म्हणजे "सीतेला योग्य असा वर" असाच झालाय, हे त्यामुळेच.

सीतेच्या पश्चात लवांकुश जाणते होईपर्यंत केवळ कर्तव्य म्हणून राम अयोध्येचा राज्यकारभार करीत होता. लवांकुशांवर जबाबदारी सोपवण्याची योग्य वेळ जवळ आली होती तेव्हाच चर्चेसाठी त्याने काळाला पाचारण केलं. काळाशी चर्चा सुरू झाली त्यावेळी द्वारपाल म्हणून लक्ष्मणाला ठेवलं होतं. त्यानंतर महर्षि दुर्वास यांचं अयोध्येत अचानक येणं, लक्ष्मणाने त्यांना आधी अडवणं, नंतर त्यांच्या श्यापापासून त्रैलोक्याला वाचवण्यासाठी रामाची आज्ञा मोडणं, आणि घडलेल्या पूर्ण प्रकाराबद्दल प्रायश्चित्त म्हणून आधी लक्ष्मणाने आणि नंतर रामाने शरयूत जलसमाधी घेणं या घटना एकापाठोपाठ घडतात तिथे रामाचं अवतारकार्य संपतं. संपूर्ण रामायणात कर्तव्यपालनाचं सूत्र तर आहेच. पण खर्‍याखुर्‍या लोकशाहीची संकल्पनादेखील दिली आहे. जिथे मंथरा, धोबी अशा सामान्य जनतेच्या शब्दाला किंमत आहे आणि जिथे राज्यकर्ता अग्निपरीक्षा देण्यास आणि वेळ पडली तर जनतेच्या इच्छेचा मान राखून पदच्युत होण्यास तत्पर आहे तिथे "रामराज्य" असणारच.

॥इति॥