मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, March 25, 2008

बर्‍याच दिसांनी

बर्‍याच दिसांनी तानपुर्‍यातुन
उमटला आज स्वयंभू गंधार
बर्‍याच दिसांनी प्रसन्न मनाने
आराधना केली साधावया सूर

बर्‍याच दिसांनी अनुभवले की
सकाळी पडले आज लख्ख ऊन
बर्‍याच दिसांनी थंडी ती विरली
आणि झाले वसंताचे आगमन

बर्‍याच दिसांनी आस्वाद घेऊन
यथेच्छ जेवलो सुग्रास भोजन
बर्‍याच दिसांनी आज लोचनांनी
घेतले जगाचे सौंदर्य टिपून

बर्‍याच दिसांनी होऊन बेभान
नाच नाचलो मी रंगात रंगून
बर्‍याच दिसांनी आनंदाचे डोही
नाहले होऊनी दंग आज मन

Friday, February 29, 2008

आयुष्य (१)

आयुष्य असतं सुगंधी पुष्प
बागेमध्ये फुलणारं
देवाला प्रिय होऊन
निर्माल्य बनणारं

आयुष्य असते चंद्रकोर
नयनांना मोहवणारी
पूर्ण बिंब होण्यासाठी
कलेकलेनं वाढणारी

खरंच असतं का आयुष्य
इतकं रेखीव आणि सुंदर?
की असतं ते एक तुटलेलं स्वप्न
दुःखदायक वरचेवर?

आयुष्य असेल कदाचित् समुद्रलाट
किनार्‍याला लागणारी
स्पर्श होताच मागे फिरून
अंतर्धान पावणारी

आयुष्य असावा गंधार
तानपुर्‍यातून बोलणारा
सुरेल तारा छेडल्यावर
स्वतःहून प्रगटणारा

होवो त्याची फुलवात
निरांजनात तेवणारी
स्वत: पूर्ण जळून
परिसर प्रकाशमान करणारी

Monday, February 11, 2008

अमोल

काळाच्या पडद्याआड जेव्हा निघून जाती सगेसोयरे,
आठवणींच्या मालिकेत त्यां शोधीतसे हे मन बावरे.

पुत्र कुणाचा, मित्र कुणाचा, बंधू, दीर कुणाचा तो;
सोडुन गेला एकाएकी, जैसा नभी तारा तुटतो.

तत्पर होता मदत कराया, नच ठाऊक त्याला थकणे;
आसपास झळकतसे त्याचे असणे, दिसणे, वावरणे.

दृष्ट लागली कुणाची तरी या लाखातील एकाला,
निर्घृणपणे कोणी केले काळ्या रात्री ठार त्याला.

जन्माला येणार्‍या जीवां अटळ मरण हे सत्य जरी,
अकाली का ते यावे, देण्या अंध:कार कुणाच्या दारी?

सग्यासोयर्‍यांमध्ये आता एक जागा सदैव रिक्त;
असणे त्याचे आता राहे त्याच्या आठवणींतच फक्त.




माझा मावसभाऊ, (स्व.) अमोल बुधवार, दि. ६ फेब्रुवारी २००८ रोजी अचानक आम्हा सर्वांना सोडून गेला. त्याच्या अस्तित्वात इतका उत्साह आणि जिवंतपणा होता, की तो आमच्यात नाही हे स्वीकारायला मन तयार होत नाहीये. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो आणि मावशी, काका, आजी, अनंत, अक्षय, सौ. योगिनी वहिनी, चि. रुची व चि. अनन्या, तसेच अमोलच्या सर्व आप्तस्वकीयांना धीर देवो.

Tuesday, January 29, 2008

अभिनेते, नेते, तरुणपिढी आणि विडी

तंबाखूसेवन व धूम्रपानास चित्रपट अभिनेत्यांबरोबर आता राजकीय नेत्यांनाही प्रतिबंध लागू होणार असल्याची बातमी वाचली. धूम्रपान करून आरोग्य गमावणार्‍या जनतेबद्दल आरोग्य मंत्रालयाला वाटणारा कळवळा(?) पाहून मन भरून आलं. नुकतंच, शाहरुख ख़ान आणि अमिताभ बच्चन यांना चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये देऊ नयेत असं आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केलं. चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये नसावीत असं खरंतर पूर्वीच सरकारनं आवाहन केलं होतं. चित्रपटात पाहिल्यामुळे ५२ टक्के तरुणवर्ग धूम्रपानास उद्युक्त होतो असा कुठलासा अहवाल सांगतो. असा प्रतिबंध घातल्याने धूम्रपान आटोक्यात येईल यावर ज्याचा विश्वास असेल.... देव त्याचं भलं करो.

दोन वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. मी पुण्याहून बडोद्याला खाजगी कंपनीच्या बसने जात होतो. माझ्या शेजारच्या सीटवर एक गुजराथी मनुष्य होता. साधारणपणे माझ्याच वयाचा. नाशीकजवळ एका 'रेस्टोरंट अँड बार'पाशी जेवणासाठी बस थांबली. तेव्हा "डु यु टेक ड्रिंक्स?" असा थेट प्रश्न मला या सहप्रवाशानं विचारला तेव्हा मी अवाक् झालो. माझी त्याची ओळखही नव्हती. पुणे ते नाशीक प्रवासातल्या चार तासांमध्ये आम्ही एकमेकांना 'हाय, हॅलो' सुद्धा म्हटलं नव्हतं आणि एकदम हा प्रश्न! मी पीत नाही हे कळल्यावर त्याला विलक्षण आश्चर्य वाटलं. "महाराष्ट्रात दारू प्यायला मनाई नसतानाही दारू पीत नाही! हे म्हणजे जणु हरिद्वारला राहून गंगास्नान न करणं....." इत्यादि चेहर्‍यावर भाव करून तो स्वत: मनसोक्तपणे आचमन करायला गेला.

कुणी काय खावं किंवा प्यावं, यावर मी भाष्य करू इच्छित नाही. मद्यपान/धूम्रपान/तंबाखूसेवन चांगले का वाईट यावरही मत मांडू इच्छित नाही. पण अशी सक्ती करून काही साध्य होणार आहे का?

साध्य होणार तर! कारण ज्या गोष्टीची मनाई आहे, ती करून पाहणे हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे, जे साध्य करायचंय त्यावर बंदी आणणे याहून सोपा मार्ग नाही. आणि मी, भारतीय मनुष्य, सगळं काही अगदी सोयीस्करपणे पदरात पाडून घेतो. मोलकरिणीचं काम खालच्या दर्जाचं मानणार. पण मला घरकामासाठी मोलकरीण हवी. वेश्या-व्यवसाय अधिकृत करायचा? छे! छे! .. पण मी वेश्येकडे जाणार. 'संसारा उध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू'च्या जाहिराती देऊन दारुबंदी करणार(?) आणि खास वाईन उत्पादनासाठी द्राक्षांची शेती करणार. 'सिगारेट स्मोकिंग इज इंज्यूरिअस टु हेल्थ' चा प्रचार करणार आणि हे ब्रीदवाक्य छापण्यासाठी सिगारेट विकणार...... चलता है! .....

Thursday, January 10, 2008

नितांत सुंदर वनराई ही असे गूढ, घन













बहुदा मज तो ठावे, ही वनराई ज्याची;
त्या तिथल्या खेड्यात असे झोपडी तयाची.
हिमवृष्टी होताना पाहत थांबियलेल्या
मला, न तो पाहील इथे वनराईपाशी.

"अघटित घडले?" करी विचार हा घोडा माझा
"नसे उचित जागाही येथे विश्रामाला.
गोठियलेले सरोवर तथा ही वनराई,
काळ्या रात्री काय प्रयोजन थांबायाला?"

हलकेच मान हालवून वाजवी तो घंटी
विचारी जणू "अनुचित घडली बात कोणती?"
त्या नादाविण असे चहुकडे शांत शांत; पण,
हिमकण वाजती, गर्जते हवा स्वैर वाहती

नितांत सुंदर वनराई ही असे गूढ, घन
परंतु वचने अनेक मज पाळणे अजून
आणि चालणे अखंड निजण्याआधी अंतर
आणि चालणे अखंड निजण्याआधी अंतर



"स्टॉपिंग बाय वुड्स् ऑन अ स्नोई ईव्हिनिंग" ही रॉबर्ट फ़्रॉस्ट यांची कविता अनेक वर्षांपूर्वी वाचली होती. आज सहजच इंटरनेटवर ती कविता पुन्हा वाचनात आली, आणि अनुवाद करण्याचा मोह झाला. यातील यमकाचा प्रकार ( १,१,२,१; २,२,३,२; ३,३,४,३; ४,४,४,४ ) मूळ कवितेप्रमाणे आहे. स्वैर अनुवादात एक-दोन ठिकाणी थोडे बदल करावे लागले. मूळ कवितेचं उत्कृष्ट रसग्रहण इंटरनेटवर वाचल्यावर जास्त चांगल्या रीतीने आकलन झालं व अनुवाद करताना त्याची फार मदत झाली. अर्थात, रॉबर्ट फ़्रॉस्ट यांचे विचार साकारण्यात यशस्वी झालो की नाही, ते मला माहित नाही.

Tuesday, December 25, 2007

तू येशील कधी

मेघांनी नभ झाकले, पसरला काळोख सर्वत्र हा
वारा वाहतसे अचानक पुन्हा ही वीज वाजे पहा
वर्षेची सर आज चिंब करण्या येऊन गेली जशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी

थंडी व्याकुळ घोर ती करितसे जीवास रात्रंदिनी
पानेही झडली तरूंवरुन ती, झाली हवा कोरडी
पुष्पांचा मधुगंध तो पसरुनी वाहे हवा मंदशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी

थंडी ती सरता धुके विरतसे कालांतराने मग
बैसोनी मग कोकिळा करितसे मंद स्वरे कूजन
येता नूतन पालवी बहरती झाडे वसंती जशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी


'शार्दूलविक्रीडित' या वृत्तात आज अचानक ही कविता जुळून आली (चाल- रामो राजमणि: सदा विजयते).

Monday, December 24, 2007

सहस्रचंद्रदर्शन

हिंदू संस्कृतीत जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे जन्मदिवस साजरा करण्याची पाश्चात्य पद्धतही भारतात आता चांगलीच रूढ झाली आहे. तरी, निदान काही जन्मदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत अशी विचारधाराही अस्तित्वात आहे व त्यातून एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, इत्यादि सोहळे लोकप्रिय झालेत. संस्कृतीचं जतन करणे ही बाब निश्चितच स्तुत्य आहे. पण, हल्ली प्रत्येक गोष्टीत घाई करण्याची सवय असते त्यानुसार विशेषत: सहस्रचंद्रदर्शनसोहळा लवकर साजरा केल्याचे प्रकार हल्ली अनेकदा घडले. या सोहळ्याविषयी मला काही जेष्ठ व्यक्तींकडून मिळालेली माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेखनप्रपंच. यात कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही.

सर्वप्रथम आपण हिंदू कालगणनेबद्दल थोडी माहिती करून घेऊ. हिंदू कालगणना चांद्र-सौर पद्धतीची आहे. म्हणजे, चांद्रमास प्रचलित असून अमावस्येच्या वेळी सूर्याच्या राशीवरून महिन्यांचं नामकरण केलं जातं. उदा. मीन राशीत सूर्य असताना अमावस्या झाली, की त्यानंतर सुरू होणार्‍या महिन्याला 'चैत्र' हे नाव देण्यात आलं व याप्रमाणे पुढील महिन्यांचं नामकरण केलं गेलं. सूर्य एकाच राशीत असताना दोन अमावस्या झाल्या, तर अनुक्रमे अधिक व निज असे एकाच नावाचे दोन महिने होतात. (उदा. अधिक श्रावण, निज श्रावण.) अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो. याचा अर्थ, हिंदू कालगणनेनुसार तीन वर्षांत १२X३+१ = ३७ महिने येतात. (क्षयमासाचा अपवाद वगळला आहे.) म्हणजे, ३ वर्षांत ३७ पौर्णिमा (३७ वेळा पूर्णचंद्र दिसतो) त्यानुसार ८१ वर्षांत ३७X२७ = ९९९ वेळा पूर्ण चंद्र दिसतो.

याचा अर्थ, पौर्णिमेचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवशी (पंचागानुसार ८१ वर्षे पूर्ण होतात तो दिवस) व इतर कोणत्याही तिथीचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवसानंतर येणार्‍या पहिल्या पौर्णिमेला १०००वा पूर्णचंद्र दिसेल. हाच सहस्रचंद्रदर्शनसोहळ्याचा दिवस.