मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Saturday, December 20, 2008

नजर (२)

ओतप्रोत ओसंडतो
जगीचा झगमगाट;
त्यावर भाळे नजर
धरे ऐहिकाची वाट.

प्रतिष्ठित असे कुणी,
तैसे कुणी उपेक्षित;
होमकुंडी हव्यासाच्या
ज्वाला अखंड तेवत.

जुगार खेळी नजर
वासना विखारलेली;
शील लीलावात गेले
अपमानित पांचाली.

वासनेच्या त्या विखारी
आशाळभूत नजरा;
येई भोवळ जीवाला
पाहुनी त्यांचा पसारा.

एक हक्काचा आसरा
शोधीतसे ती नजर;
परी हिरमोड होई
चाले सर्वत्र बाजार.

जाई थकुन नजर
नजरांच्या नजरांनी;
"आयुष्याची ही लक्तरे"
म्हणे, "सांभाळे का कोणी?" (२)

नजर (१)

ती लाडिक नजर तुझी टिपली मम अक्षे
उघडली तदा जणु आयुष्याची गवाक्षे
फुलवून पिसारा मनमोराचा तेव्हा
हर्षात नाचलो, तुला पाहिले जेव्हा

डोळ्यांत सतत तू, झोप न ये मग रात्री
रोमांच येती तव आठवणींनी गात्री
वाटे, भेटावे तुला, आणि सांगावे
जे विचार माझे, तुजला सर्व कळावे

पण कशी करू सुरुवात? कळे ना काही
तू समोर येता, विचारभान न राही
सांगण्या मनीचा विचार तुजला राणी
तुज पत्र लिहाया धरिली मी लेखणी

प्रतिसाद तुझाही आहे होकारार्थी,
तव नजर बोलते अन्‌ मजला ही खात्री
मग कशास आता आंधळी कोशिंबीर?
सांजवेळी भेटू गाठुन सागरतीर

Sunday, November 30, 2008

हायकू

आली भरती
समुद्रास परंतु
सांज जाहली

Monday, October 27, 2008

धार्मिक कृत्ये व पंचाग - भाग १: लक्ष्मीपूजन

सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नरकचतूर्दशी, लक्ष्मीपूजन इ. केव्हा आहे, हे पाहण्यासाठी दाते पंचाग उघडलं, व काही महत्त्वाच्या बाबी चटकन डोक्यात आल्यात. विषय मोठा असल्यामुळे एकाच पोस्टात सांगणं अवघड आहे. त्यामुळे "धार्मिक कृत्ये व पंचांग" हे नवीन सदर सुरू करतोय. त्याचे सर्व भाग लागोपाठच देईन असं नाही. वेगवेगळ्या सणांच्या वेळी (आवश्यक तेव्हा) या सदरात माहिती देत राहीन. आता दिवाळी सुरू असल्यामुळे पहिल्या भागात यंदाच्या लक्ष्मीपूजनाबद्दल माहिती देत आहे.

तिथी, वार, योग, करण व नक्षत्र या कालमापनाच्या पाच अंगांपासून हिंदू पंचाग बनलं आहे. हिवाळा, उन्हाळा, पुन्हा पावसाळा असं काळाचं चक्र ज्याप्रमाणे विशिष्ट गतीने चालू असतं, त्याप्रमाणे पंचांगातील या पाच अंगांची आवर्तनेही कालमर्यादेत बांधली आहेत. या समन्वयाचा उपयोग ऋतुमानानुसार जे सण साजरे करतात त्यांचा काळ/मुहूर्त ठरवण्यासाठी केला जातो. हिंदूंच्या बहुतांश सणांशी धार्मिक कृत्ये निगडित असतात. आकाशस्थ ग्रह-तार्‍यांना हिंदू धर्मात देवता मानल्यामुळे विशिष्ट धार्मिक कृत्याचे वेळी आकाशात विशिष्ट स्थितीत ग्रह-तारे असावेत असा धर्मशास्त्राचा विचार आहे. यामध्ये काही प्रमाणात वैज्ञानिक कारणे आहेत, तर काही बाबतीत सामाजिक सोयींचा विचार आहे. व्रतवैकल्यांमध्ये काळानुरूप बदल करायचे असल्यास त्यातील वैज्ञानिक बाबी कोणत्या व सामाजिक सोयींशी निगडित बाबी कोणत्या, हे समजून घ्यायला हवं.

परदेशस्थ भारतीयांमध्ये सुटीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावं म्हणून सणानजीकच्या वीकांतात तो सण साजरा होतो व ते योग्यच आहे. परंतु, त्या त्या सणांशी निगडित असलेली धार्मिक कृत्ये घरातल्या घरात करायची असल्यामुळे ती वेळाच्या वेळीच करावी अशी अनेकांची इच्छा असते, आग्रह असतो व त्यानुसार सर्व विधी यथासांग करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतं. भारतामध्ये राहणार्‍या लोकांना भारतातलं पंचाग सहज उपलब्ध असल्यामुळे व्रतवैकल्यांसाठी योग्य दिवस, वेळ निवडणं अत्यंत सोपं आहे. परंतु, इथे अमेरिकेत व्रतवैकल्ये साजरी करताना पंचाग सहजपणे उपलब्ध होत नाही. पंचाग उपलब्ध झालं, तरी त्यातल्या महत्त्वाच्या बाबी माहित नसल्यामुळे "चार-लोकं करतात तसे करावे" किंवा भारतापेक्षा साधारणपणे अर्धा दिवस मागे असल्यामुळे भारतात ज्या तारखेला सण साजरा होतो, ती तारीख अमेरिकेत उजाडल्यावर अमेरिकेत साजरा करायचा, असं अनेकांचं मत आहे. परंतु, ते प्रत्येकवेळी बरोबरच असेल असं नाही. किंबहुना, "तिथी" या अंगावर अवलंबून असलेले बरेच विधी करताना दिवस चुकू शकतो. धार्मिक कृत्यांपैकी "तिथी"शी जी कृत्ये अवलंबून आहेत, त्यांत काहींसाठी सूर्योदयाचे वेळी, काहींसाठी सूर्यास्ताचे वेळी ती तिथी असणं आवश्यक असतं, तर काही व्रतवैकल्यांमध्ये दिवसभरात ती तिथी किती वेळ असते याच्याशी संबंध असतो.

सध्या दिवाळी सुरू असल्यामुळे त्यातलंच उदाहरण देतो. अश्विन कृष्ण द्वादशी (गोवत्सद्वादशी - वसुबारस) पासून कार्तिक शुक्ल द्वितीया (यमद्वितीया - भाऊबीज) या दिवसांमध्ये घरात पहाटे व सायंकाळनंतर पणत्या प्रज्वलित करायचा तो हा सण : दिवा + आळी = दिवाळी. यात अश्विन अमावस्येच्या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केलं जातं. धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार सूर्योदयापासून सूर्यास्तानंतर १ घटिकेपेक्षा जास्त (१ घटिका = सुमारे २४ मिनिटे) अमावस्या असल्यास त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. दोन दिवस अमावस्या असेल, तर दुसर्‍या दिवशी सूर्योदयानंतर साडेतीन प्रहरांपेक्षा जास्त (साडेदहा तासांहून जास्त) वेळ अमावस्या असल्यास दुसर्‍या दिवशी, अन्यथा पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे.

आता यंदाचं पंचांग पाहू (शालिवाहन शक १९३०). यंदाच्या दाते पंचागात सांगितल्यानुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार दि. २८ ऑक्टोबर २००८ रोजी पहाटे ३:३३ वाजता अमावस्या सुरू होऊन दि. २९ ऑक्टोबर २००८ ला पहाटे ४:४४ वाजेपर्यंत अमावस्या तिथी राहणार आहे. याचा अर्थ, भारतामध्ये २८ तारखेला दिवसभर अमावस्याच असणार व पुढील वार सुरू होईल तेव्हा (दुसर्‍या दिवशी सूर्योदय होईल तेव्हा) प्रतिपदा सुरू झालेली असेल. त्यामुळे (दाते पंचांगात सांगितल्यानुसार) भारतात मंगळवार दि. २८ रोजी सायंकाळी लक्ष्मीपूजन करणं शास्त्राला अभिप्रेत आहे.

आता अमेरिकेमध्ये अमावस्या केव्हा आहे ते पाहू. कॅलेंडरवरील तारीख सूर्योदयास्तावर अवलंबून असली, तरी तिथीचं तसं नसतं. कालनिर्णय डॉट कॉम या वेबसाईटवर न्यू यॉर्क, शिकागो व सॅन फ़्रॅन्सिस्को या तीन शहरांसाठी पंचांग दिलं आहे. ढोबळमानाने नजीकच्या शहरांमध्ये त्यांचा आधार घेता येऊ शकतो.
न्यूयॉर्कमध्ये सोमवार दि. २७ रोजी अमावस्या सुरू होत असून दि. २८ रोजी सूर्यास्तानंतरपर्यंत अमावस्या आहे (साडेतीन प्रहराहून अधिक काळ). शिकागोमध्ये दि. २७ रोजी अमावस्या सुरू होते आहे व सूर्योदयापासून साडेतीन प्रहराहून थोड्या जास्त वेळासाठी अमावस्या आहे. सॅनफ़्रॅन्सिस्कोमध्ये २७ तारखेला अमावस्या सुरू होत आहे व दि. २८ ला साडेतीन प्रहरांपेक्षा जवळ जवळ दोन तास कमी वेळ अमावस्या आहे. याचा अर्थ, सॅनफ़्रॅन्सिस्कोपेक्षा साधारणपणे दोन तास आगोदर सूर्योदय होतो त्या शहरांमध्ये व त्यांच्या पूर्वेकडे मंगळवार दि. २८ रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्राला अभिप्रेत असून पश्चिम अमेरिकेत मात्र सोमवारी म्हणजे दि. २७ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं उचित ठरेल. अलास्का व हवाई बेटांवरसुद्धा २७ तारखेलाच लक्ष्मीपूजन करणं योग्य ठरेल.


भाग १ चे संदर्भ:

१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३० - सर्वधारीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/

Saturday, October 18, 2008

पहाट-प्रभात

पहाट झाली
नभ झाले केशरी
उजळे प्राची

पक्षी जमले
किलबिल करण्या
झाडांवरती

अंगणातला
मोगरा बहरला
सडा सांडला

गंध फुलांचा
हळूच पसरुन
वाहे समीर

पानांवरती
चमचम करती
माणिक मोती?

रविकिरणे
अंगावर सांडली
दवबिंदूंच्या

हा हा म्हणता
तम विरले आणि
लख्ख जाहले

प्राचीवरती
अरुणोदय झाला
प्रभात झाली


सुमेधाने सुरू केलेला साखळी हाईकूचा खेळ, सईने हाईकुबद्दल दिलेली माहिती आणि त्यानंतर सुमेधाने केलेली चांद लबाड ही हाईकु-कविता, या सगळ्यांतून प्रेरणा घेऊन मीसुद्धा हाईकु करण्याचा प्रयत्न केला. नंतर सईशी गुगल-गप्पांमध्ये चर्चा झाल्यावर हाइकु म्हणजे केवळ तीन ओळींची कविता (कडवं नव्हे!) हे कळलं. असो. तर हाइकुमधलं ५-७-५ असं अक्षरांचं बंधन जरी या कवितेत असलं, तरी या कवितेत अनेक कडवी असल्यामुळे याला हाइकु म्हणणं योग्य ठरणार नाही. "हाइकु"च्या वृत्ताची (किंवा वृत्तीची?) कविता असं या रचनेकडे पाहता येईल का?

Sunday, September 28, 2008

लतादीदींना

अंगाई वा प्रेमगीत वा असो ईश्वराचे ध्यान
विरह असो वा गाण्यात असो देशभक्ती महान
अंखंड राहो बरसत तुमच्या गळ्यामधुनिया तान
तृप्त करित राहो संतत ते रसिकश्रोत्यांचे कान
ध्रुवतार्‍यासम अचल "लता" हे संगीतातिल स्थान
शब्दांमध्ये अशक्य कथणे कीर्तीचे महिमान
सदा मिळो नवपिढीस तुमच्या गाण्यातुन प्रेरणा
"जुग जुग जिये लतादीदी" ही ईशचरणी प्रार्थना



आज २८ सप्टेंबर. ज्यांच्या गाण्याने "सुबह चले, शाम ढले" अशी लाखो रसिकांची दैनंदिनी आहे, त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गायिका, भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लतादीदींचा आज वाढदिवस. लतादीदींबद्दल लिहिण्याइतकी माझी योग्यता नाही. त्यांच्या प्रतिभेला साजेसे तोलामोलाचे शब्द सुचत नसले, तरी पण एक रसिक म्हणून मला जे काही सुचलं, ते आदरणीय दीदींना प्रेमपूर्वक अर्पण करतो. त्यांना आयुरारोग्य लाभो व त्यांचा संगीतप्रवास असाच अखंडपणे चालत राहो व रसिकांना मोहिनी घालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Saturday, September 27, 2008

आवडलेले थोडे काही

संवेदने सुरु केलेला खो-खो चा उपक्रम आवडला व त्यात सहभागी होण्याची इच्छा त्याच्या ब्लॉगवर व्यक्त केल्यावर विरोपाद्वारे त्याने मला खो दिला. तो स्वीकारून मला आवडलेल्या कविता इथे देत आहे, त्यापूर्वी संवेदने दिलेले खो-खोचे नियम इथे सर्वांच्या सोयीसाठी देतो.

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा.
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेवढ्या कविता तेवढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सार्‍यांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तिचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा.
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही.
५. अजून नियम नाहीत :)

संवेदने "एक से मेरा क्या होगा" सिंड्रोमबद्दल सांगितलं. मला तर "दो से मेरा क्या होगा" सिंड्रोमही आहे. पण तरी त्याला आवरतो आणि मला आवडणार्‍या दोन कविता इथे देतो.

पहिली कविता -

"वीज म्हणाली धरतीला" या नाटकातली आहे.
कवी -कुसुमाग्रज

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यांत हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या, ती चालली
तीन होत्या दीपमाला एक होती सावली

बाण आला एक कोठुन, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले, गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर झाले यात सारे पावले


(ता.क. संपूर्ण कविता "आठवणीतली गाणी" या संकेतस्थळावर अत्ताच सापडली. त्यानुसार वरील कवितेत बदल केले आहेत.
-प्रशांत, २१ जून २००९)

दुसरी कविता -

कोठेही जा!
कवी - सुरेश भट

कोठेही जा दूरदूर तू माझ्यापासुन ...
माझे गीत तुला तेथेही काढिल शोधुन!

न्हाउन जेव्हा केस मोकळे देशिल सोडुन
दरवळेल हा मंदमंदसा सुगंध होउन

सहज अहेतुक तू एकांती करशिल गुणगुण ...
तुझिया नकळत स्वरात मिसळत जाइल हे पण-

वा गाण्याचा होता आग्रह सखीजनांतुन
अनाहुतासम तुझिया ओठी बसेल जाउन

आणि शेवटी असाच तुजला येता अनुभव,
तुजला माझ्या ह्या असण्याचा होइल आठव


आणि आता वेळ आली खो देण्याची -
माझा खो नीरजाआदित्य यांना.